सूर्यकांत पाटणकर
पाटण -राज्याच्या वीज निर्मितीसाठी आणि सिंचन क्षेत्रासाठी महत्त्वाच्या कोयना धरणाने सप्टेंबरमध्ये पाणीसाठ्याची शंभरी ओलांडली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शुक्रवारी पाणीसाठा 100.16 टीएमसी झाला. धरणाच्या पायथा वीजगृहातून 42.56 तर सहा वक्र दरवाजांमधून 36.88 टीएमसी, असे 79.44 टीएमसी पाणी आतापर्यंत विनावापर कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरण भरल्याने यावर्षी दुष्काळी भागाला दिलासा मिळणार आहे.
कोयना धरणाच्या पाणीसाठ्याचे नियोजन 1 जून ते 30 मे असे करण्यात येते. धरणातील 29 टीएमसी पाणी पूर्वेकडील सिंचनासाठी वापरले जाते, तर 69 टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी वापरले जाते. पूर्वेकडील सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर पायथा विद्युतगृहातून वीजनिर्मिती करून पाणी सोडण्यात येते. उन्हाळ्यात दुष्काळी भागाची मागणी वाढल्यावर हे पाणी सोडण्यात येते.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 10 जूननंतर पावसाला सुरुवात झाली. या वर्षी 15 जूननंतर धरणाचा पाणीसाठा हळूहळू वाढत गेला. यावर्षी प्रथम 18 जूनला पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक पाणी सोडण्यात आले, तेव्हा पाणीसाठा 35.46 टीएमसी होता.
धरणात 24 हजार क्युसेक पाण्याची आवक होती. त्यानंतर काही काळ उसंत घेतलेल्या पावसाने 18 जुलै दरम्यान जोर धरला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतक पूर्ण केले. पाणलोट क्षेत्रात 21 ते 23 जुलै या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली. धरणाचा पाणीसाठा तब्बल 17 टीएमसीने वाढला. पाण्याची आवक 3 लाख 90 हजार क्युसेकवर पोहोचली होती. या दरम्यान पाटण तालुक्यात आंबेघर, मिरगाव, ढोकवळे येथे भूस्खलन होऊन 29 जणांचा मृत्यू झाला.
मुसळधार पावसामुळे पाणीसाठा झपाट्याने वाढल्याने 23 जुलैला धरणातून तब्बल 53 हजार 360 कयुसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला. 23 जुलै ते 4 ऑगस्ट 13 दिवसांत धरणातून तब्बल 36.88 टीएमसी पाणी, तर पायथा वीजगृहातून 42.56 टीएमसी पाणी सोडण्यात आले.
यंदा धरणातून तब्बल 79.44 टीएमसी पाणी विनावापर सोडण्यात आले. धरणातील पाणीसाठ्याने शंभरी ओलांडल्याने, पुढील वर्षी दुष्काळी भागाला दिलासा मिळेल. लवादानुसार दुष्काळी भागातील गावांनी मागणी केल्यास कोयना धरणातून पाणी सोडण्यात येते. सध्या पाणलोट क्षेत्रात संथगतीने पाऊस पडत असून, धरणात 17 हजार 391 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणीपातळी दोन हजार 159.07 फूट झाली आहे. सध्या धरणातून विसर्ग बंद आहे.
विक्रमी पावसाची नोंद
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या वर्षी पावसाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. नवजा येथे पाच हजार 158 मिमी, महाबळेश्वर येथे पाच हजार 154 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद वळवण येथे झाली आहे. तेथे आतापर्यंत तब्बल पाच हजार 914 मिमी पाऊस झाला आहे.