खटाव – खटाव तालुक्याच्या पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका असल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ भक्कम असून खटावची पत्रकारिता समृद्ध आहे, असे मत डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
खटाव येथे ग्रामपंचायतवतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कुदळे, जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व युवा नेते राहुल पाटील, माजी उपसरपंच अमर देशमुख, रमेश शिंदे, अभिजीत देशमुख, कै लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टचे विश्वस्त उमेश भिसे, चरण बोबडे, गणेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ प्रिया शिंदे म्हणाल्या, आजवर खटावच्या मातीत अनेक आदर्श पत्रकार घडले. त्यांनी कायमच सर्वसामान्य लोकांना लेखणीच्या माध्यमातून न्याय दिला आहे. समाजमन आणि राजकारणाची दिशा बदलण्याची ताकत त्यांच्याकडे आहे. खटावची पत्रकारिता निश्चितपणे समृद्ध आहे. युवा नेते राहुल पाटील म्हणाले, खटावला फार पूर्वीपासून पत्रकारितेचा समृद्ध वारसा आहे.हा समृद्ध वारसा जतन करण्याचे काम सध्याचे येथील पत्रकार देखील आत्मीयतेने व प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहात त्यांना प्रेरणा व अधिक बळ देण्यासाठी पत्रकार दिनानिमित्त त्यांचा सन्मान होणं खूप आवश्यक आहे.
यावेळी नम्रता भोसले, संजय देशमुख, राजेंद्र शिंदे, किरण देशमुख, नदिम मुल्ला या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. उपसरपंच राहुल जमदाडे यांनी प्रास्ताविक केले. तर संजय देशमुख यांनी आभार मानले.