सातारा – ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला दरवाजे स्वागत कमानीची शोभा वाढविणाऱ्या हारातील झेंडू पुलाला भाव मिळेनासा झाला आहे . 40 ते 50 रू किलोने बाजारात विक्री होत असून उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. साताऱ्याच्या बाजारात अवकाळी पाऊस तसेच सातत्याने उघडीप घेणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या उष्ण व आर्द्र या विचित्र हवामानामुळे झेंडूची पिक वाचवताना कराड, सातारा, वाई या तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रचंड कसरत झाली.
शनिवारी मार्केटमध्ये दहा टन झेंडूची आवक झाली, मात्र यंदाची दसरा, दिवाळी शेतकऱ्यांसाठी फारशी उत्साहवर्धक ठरली नाही. सध्या झेंडूवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील अशा फुलांचे दरही गडगडले आहेत. ऐन सणासुदीत झेंडूवर निसर्गाची अवकृपा झाल्श्रयाने शेतकऱ्यांनी घातलेला खर्चही निघणार नाही, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे दिवस-रात्र काबाडकष्ट करून फुलवलेला झेंडू ऐन सणासुदीत हिरमुसला असून शेतकऱ्यांचे कष्टही मातीमोल ठरले आहेत.
दिवाळीत कमी कालावधीत चांगले पैसे मिळतील, या इराद्याने जिल्ह्यातील शेतकरी झेंडू फुलशेतीकडे वळाले. त्यासाठी सणांचा हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले. गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंतच्या सणासुदीला फुलांना चांगला दर मिळून कष्ट करून फुलवलेल्या झेंडूतून चार पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र झेंडूला किलोचा दर साठ रुपयांच्या जवळपास रैगाळल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही शेतकऱ्यांनी झेंडूची लागणही जूनदरम्यान केली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाऊस चांगला झाल्याने झेंडूची वाढही चांगली झाली. त्यानंतर झेंडू कळीत असताना पावसाचा जोर वाढला.
त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची आशा मावळली. मात्र, काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने फुले चांगली फुलली. ती चांगली आल्याने शेतकरी समाधानी झाला. त्याला सुरुवातीच्या टप्प्यात बाजारपेठेत 25 ते 30 रुपये किलोला भाव मिळत होता.
त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत फुलांचा तोडा करून ती बाजारपेठेत पोचवण्याची व्यवस्था केली. तीन-चार तोडे झाल्यानंतर ऐन गणेशोत्सवात पुन्हा वातावरणात बदल झाला.
फुले भिजली, रोगही पडल्याने शेतकऱ्यांना फटका
पावसाचा जोर पुन्हा वाढला. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. पावसात झेंडूची फुले तोडताना रोपांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी फुलांच्या रोपासाठी लावलेल्या आधाराच्या काठ्या मोडल्या. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. तशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पावसात भिजत झेंडूची तोडणी करून बाजारात विक्रीसाठी फुले नेली. मात्र, अशातच झेंडूवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था हिरमुसल्यासारखी झाली. करपा रोगामुळे तोडा करता आला नाही.
===================