कोरेगाव – उसाला पहिला हप्ता प्रतिटन साडेतीन हजार रूपये मिळावा, मागील हंगामातील उसाला 400 रूपयांप्रमाणे दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कुमठे फाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सातारा-लातूर, कोरेगाव-भाडळे या प्रमुख मार्गावरील वाहतूक खंडित झाली.
ऊस दराचा प्रश्न तातडीने निकाली निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष जीवन शिर्के यांनी दिला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची मुक्तता केली.
साखर कारखान्यांनी मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 400 रूपयांचा दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी गेल्या महिन्यापासून संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यात आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील हंगामातील दुसरा हप्ता व चालू हंगामासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार रूपयांची मागणी केली आहे. मात्र, याबाबत कारखानदारांकडून कोणतीच भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. राज्याचे साखर आयुक्त त्याचबरोबर जिल्हा प्रशासन या नात्याने जिल्हाधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कुमठे फाटा येथे रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक खंडित झाली.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार व उपनिरीक्षक दिपाली मुसळे यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस अंमलदार समाधान गाढवे देशमुख व सुजित गोडसे यांनी जीवन शिर्के व जोतिराम झांजुर्णे यांना चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आवाहन करत आंदोलन थांबवण्याची विनंती केली, मात्र आंदोलन ऐकण्याच्या तयारीत नव्हते.
अखेरीस अतिरिक्त फौजफाटा व मोठी पोलीस व्हॅन आंदोलन स्थळी आणून पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले. काही काळानंतर कागदोपत्री पूर्तता करून आंदोलकांची मुक्तता करण्यात आली.
घोषणाबाजीने परिसर दणाणला
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनी एकरकमी पूर्ण एफआरपी देण्याचा निर्णय घेत ऊसदराबाबत तोडगा काढला आहे, मग असाच तोडगा सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने काढतील अशी आशा होती, मात्र साखर कारखान्यांनी कोणतीच भूमिका घेतली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जाम आंदोलन करण्यास सुरवात केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आंदोलनामुळे साखर कारखान्यांची ऊस वाहतूक ठप्प झाली होती. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.