कराड – येत्या लोकसभा निवडणुकीत मतांसाठी राम मंदिराच्या मुद्याचा फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु, त्यांचा हा डाव सर्वांनी ओळखला आहे. सध्या देशात भाजप विरोधात वातावरण असून त्याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट होणे गरजेची आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
येथील आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त आयोजित फराळाच्या कार्यक्रमात माध्यमांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते. आ. चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. हे आरक्षण व्यवहारिकदृष्ट्या योग्य होते. परंतु, त्यानंतर आलेल्या सरकारला ते आरक्षण टिकवता आले नाही.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित भेटून त्याची योग्य मांडणी
करायला हवी. त्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. असेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. तसेच कॉंग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाविषयी मांडलेल्या भूमितीबाबत विचारले असता ते म्हणाले, ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. ती पक्षाची भूमिका नाही. पक्षाच्या बैठकीत आम्ही आमची मते मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिवाळीनिमित्त एकत्रित भेटले. याबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले, त्यांचे घरातल्या घरात नेमकं काय चाललंय? हे समजत नाही. त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्लेषण करणारा अजून जन्मायचा आहे, असेही त्यांनी या प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना मिश्किलपणे सांगितले.
… अद्याप जागा निश्चिती नाही
आपण लोकसभा निवडणूक लढणार का? याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, अजून आमच्या आघाडीमध्ये कोण कोणती जागा लढवणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. ते पहिल्यांदा ठरले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये जो निर्णय होईल, त्यावर पुढील दिशा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.