पवनानगर (रवी ठाकर) – मावळ तालुका हा फूल उत्पादक म्हणून ओळखला जातो. झेंडू, गुलाबा असो किंवा इतर कोणत्याही फुलांचे उत्पादन तालुक्यात होत असते. मात्र प्लॅस्टिकच्या कृत्रिम फुलांनी शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागही व्यापला आहे. प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी फुलांमुळे मनाला भुरळ पडत असून सुगंध देणाऱ्या खऱ्या फुलांना आपण विसरत चाललो आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे दर कोसळले. आता दिवाळीकडे शेतकरी आशेने पाहात आहेत. मात्र प्लॅस्टिकच्या फुलांमुळे ताज्या फुलांचा बाजार कोमेजला असून फुल शेती आणि शेतकऱ्यांवरही त्याचा परिणाम होत आहे.
देवपुजा, तोरण, सण, उत्सव, लग्न समारंभापासून ते महिलांच्या केसांमध्ये माळण्यासाठीच्या गजऱ्यापर्यंत सर्वत्र फुले हवी असतात. सजावट करण्यासाठी फुलांचा वापर होतो. मात्र, गेल्या काही वर्षात प्लॅस्टिकच्या कृत्रिम फुलांमुळे आपण नैसर्गिक फुलांच्या सुगंधाला मुकत चाललो आहोत. दुसरीकडे प्लॅस्टिक फुलांमुळे पर्यावरणाचेही नुकसान करीत आहोत. त्यामुळे आपल्याकडून निसर्गाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
घरोघरी शोभेची वस्तू विशेषता प्लॅस्टिकची फुले सण, समारंभा व्यतिरिक्तही बाजारपेठा कृत्रीम फुलांनी सजलेल्या आहेत. त्याचबरोबर रासायनिक रंगाचा वापर करून कृत्रिम फुले बनवली जात आहेत. त्यामुळे प्लॅस्टिकची फुले ही पर्यावरणासह आरोग्यसाठीही घातक आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून तर प्लॅस्टिकची फुले हव्या त्या रंगात आणि विविध आकारात आकर्षक पद्धतीने बनवून बाजारपेठेत मिळत आहेत. त्यामुळे प्लॅस्टिकच्या या फुलांनी बाजारपेठेवर ताबा मिळवल्याचे पहावयास मिळत आहे. प्लॅस्टिकची फुले दीर्घ काळ टिकणारी आणि हाताळायला सोपी असल्याने ग्राहक देखील प्लॅस्टिक फुलाकडे आकर्षित होत आहेत.
दसरा दिवाळीच्या सणात दारावर लावण्यासाठी तोरण आणण्याकरिता नागरिक बाजारात जात असे. आता प्लॅस्टिकचे दरवाजावर लावण्याचे तोरण मिळत आहे. हे तोरण धुवून पुन्हा पुढच्यावर्षी वापरता येत असल्याने नागरिकांच्या पैशाची बचत जरी होत असली तरी शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्लॅस्टिकची खोटी फुलेही खऱ्या फुलांपेक्षा अधिक आकर्षक दिसतात.
ताज्या फुलांचा बाजार कोमेजला…..
फुलांचा व्यवसाय करण्यासाठी काही अल्पभूधारक शेतकरी फुल शेतीकडे वळले होते. त्यांच्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे साधन बनत चालले होते. दसरा, दिवाळी पाडव्याला तर हमखास शेतकऱ्यांच्या फुलांना बाजारात चांगला भाव मिळायचा. मागणीही चांगली असायची. त्यामुळे कमीत कमी जमिनीतही फुले लावून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळायचे. मात्र, गेल्या काही वर्षात या प्लॅस्टिक फुलामुळे ताज्या फुलांचा बाजार कोमेजला जात आहे.