नगर – दिवाळीचा सण म्हटला, की फटाक्यांची आतषबाजी अन् फराळाच्या लज्जतदार पदार्थांचा आनंद.यंदा फराळ बनवताना महागाईमुळे सामान्यांकडे खर्चाचे फटाके फुटणार आहेत. कच्च्या मालाचे भाव वधारलेलेच असल्याने या फराळाचा गोडवा काहीसा कमी झाला आहे.
दिवाळीचा फराळ घरोघरी बनविला जातो. यात शंकरपाळे, करंजी, चकली, अनारसे, लाडू, शेव, चिवडा अशा अनेक पदार्थांचा समावेश होतो. यासाठी तेल, तूप, गूळ, साखर, रवा, डाळी, शेंगदाणे, पोहे यासारखे प्रमुख जिन्नस लागतात. मात्र या जिन्नसांचे बाजारात भाव वधारलेले असल्याने यंदा फराळ बनवताना सामन्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
काही लोक घरी फराळ बनवतात, तर काही लोक मार्केटमधून फराळ विकत आणतात. जिन्नसांच्या वाढलेल्या किमतींमुळे आयत्या फराळाला भाववाढीने घेरले आहे. तसेच फराळ बनवून देणाऱ्या कारागिरांनी देखील मजुरीत वाढ केली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीतही फराळ महागलेला असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या आहेत. दिवाळीला फराळ घरी करायचा किंवा आयता आणायचा जरी ठरवले तरी खर्चाचे गणित हे या महागाईमुळे बिघडूनच जाते.
सगळीकडे भाववाढ झालेली आहे. गृहिणींनी फराळ कसा करावा. ऐन सणासुदीत सुद्धा काटकसर करावे लागते आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
मनिषा पोळ नगर
प्रत्येक दिवाळीला महागाई वाढत जाते. त्यामुळे ठरविल्याप्रमाणे फराळाचे सर्व पदार्थ बनवता येत नाहीत. आर्थिक नियोजनानुसार शक्य होईल तसा फराळ बनवून समाधान मानावे लागत.
श्वेता महाजन नगर