मुंबई – राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत भाजपकडून केल्या गेलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी मुंबईमध्ये विराट मोर्चा पुराकला आहे. या मोर्चावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवा, अशी मागणी या मोर्चातून केली.
त्याचबरोबर मागील काही दिवसांत महाराष्ट्रातून बाहेर गेलेले प्रकल्प, राज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, मंत्री चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सुरु असलेला सीमा वाद, अशा अनेक मुद्द्यांना धरून महाविकास आघाडी व इतर पक्ष आणि संघटनांनी हा मोर्चा पुकारला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चावर खोचक टीका केली.
देवेंद्र फडणविस यांनी म्हटले की,“मोर्चा तर लहानच झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून माणसं बोलवल्यानंतर परिस्थिती अशी हवी होती की कैक किलोमीटर लांब मोर्चा झाला. पूर्ण आझाद मैदान भरणारा मोर्चा असायला हवा होता. पण मोर्चा अपयशी ठरला हे संख्येवरून दिसतंय”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर खोचक शब्दांत टीका केली.
यावर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस आणि शिंदेगटावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदार आणि त्यांच्या नेत्यांनी केलं असतं तर त्यांची बुद्धी नॅनो आहे, असं म्हणता आलं असतं. फडणवीस प्रगल्भ राजकारणी आहेत. त्यांनी असं विधान करणं महाराष्ट्राला अपेक्षित नाही. त्यांनी विरोधीपक्षात प्रदीर्घ काळ काम केलं. त्यांना कालचा विराट मोर्चा दिसला नसेल, त्यांनी अनुभवला नसेल तर हे त्यांचं दुर्देव आहे. असेही ते म्हणाले आहे.