नवी दिल्ली : दरवर्षी होणारा शिवसेनेचा बहुचर्चित दसरा मेळावा गेल्या वर्षी करोनाच्या सावटाखाली पार पडला. यंदाही करोना प्रादुर्भाव असला तरी दसरा मेळावा होणार, असे महत्वाचे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच त्यांनी या मेळाव्याच्या स्वरुपाविषयीही वक्तव्य केले आहे. शिवसैनिकांमध्ये त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असल्याचे संगणयत येत आहे.
राऊत म्हणाले की, यंदाचा दसरा मेळावा ॲानलाईन पद्धतीने होणार नाही, तर प्रत्यक्ष पद्धतीने मेळावा होणार आहे. करोना नियमांचे पालन करून दसरा मेळावा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर लवकरच निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, सरकारी यंत्रणांचा वापर करून प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यात राजकारण काय, हे विरोधकांचं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले. राहुल गांधींना जाऊ दिले जाणार नाही. लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी केली जातेय. सरकार विरोधी बोलणा-यांना देशद्रोही ठरवलं जातंय, असा आरोप देखील संजय राऊतांनी केला.
संजय राऊत यांनी काल म्हटलं होतं की, देशात नवी गुलामगिरीची सुरूवात झालीय. लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक आहे. मोदींना गांधी घराण्याची भिती वाटतेय. म्हणून प्रियांका गांधींना अडवलं जातंय. योगींनी राजीनामा द्यायला पाहीजे. मोदी देशाचा अमृत महोत्सव साजरा करायला लखनौला जाताहेत पण अमृत महोत्सव रक्तानं माखला आहे, असंही राऊत म्हणाले.
सामनाच्या अग्रलेखातून टीका करताना शिवसेनेने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे ऐकायला हवे. कायदे हे जनतेसाठी केले जातात. जनता कायद्यासाठी जन्माला येत नाही. कायदे मोडून, कायदेभंग करूनच गांधीजींनी स्वातंत्र्याचे आंदोलन पेटविले हे विसरू नका. प्रियंका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. त्यांना अटक करून त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो भ्रम आहे. त्यांच्या या भ्रमाचा भोपळा उद्या फुटल्याशिवाय राहाणार नाही. देशाचे खासगीकरण सुरू झाले आहे.
नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देश सोपवला जाऊ नये यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा व्हिडीओच समोर आला आहे. आता तरी दोन अश्रू ढाळा! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?,” असा सवाल या अग्रलेखात केला आहे.