मुंबई : महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केल्याने १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दरम्यान, यावरून रुजतील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून पुन्हा एकदा शिंदे सरकावर जोरदार टीका केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबईत माध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रा भूषण पुरस्कार देताना जी अराजक परिस्थिती निर्माण झाली. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याला सरकारचा ढिसाळ नियोजन जबाबदार आहे. त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागायला पाहिजे. राज्यात १४ निरपराध लोकांचे बळी गेले. यावरून सरकारकडून साधी संवेदनाही व्यक्त होत नाही. हे दुर्देवी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
देवेंद्र फडणवीस जर आता विरोधी पक्षनेते असते, तर त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात जाऊन धुडगूस घातला असता आणि सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करूनच ते बाहेर पडले असते. मात्र, आज ते गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. म्हणून त्यांनी आता स्वत:तल्या जुन्या फडणवीसांना जागवून मुख्यमंत्री शिंदेचा राजीनामा घ्यावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रखरखत्या उन्हात घेण्यात आला होता. त्यानंतर श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाल्याने १४ अनुयायांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून राज्यातील विरोधी पक्षातील नेते सध्या सरकारवर निशाणा साधत आहेत. तसेच या झालेल्या दुर्घटनेची सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.