मुंबई – शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला ‘जुनी खाट अधुनमधून जास्त कुरकुरते’ असा टोला मारण्यात आला होता. सामनातील या टीकेमुळे आधीच नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांमधील नाराजी वाढीस लागली आहे. दरम्यान, सामानातून केलेल्या टीकेबाबत आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य रंगलं असल्याचे आपल्याला वाटत नाही असं म्हंटलंय.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “सामनाचा एक स्वभाव आहे. एखादी गोष्ट आमच्या पद्धतीने अधिक सोपी करुन सांगतो. चांगली उदाहरणं देतो. काँग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना आणि राजकारणात मुरलेला पक्ष आहे. खाट जुनी असली की ती जास्त कुरकुरते कारण त्यांना त्यांच्या परंपरेच्या, आपल्या नेतृत्त्वाच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. मग ते बोलायला लागतात” असं ते म्हणाले.
यावेळी बोलताना राऊत यांनी, “खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधी यांच्यासारखे मेकॅनिक दिल्लीमध्ये बसले आहेत मेन्टेन्स करायला, रिपेअर करायला. ते चांगले नेते आहेत” अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांची स्तुती केली.
सरकार पाच वर्ष टिकणार
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकावं अशी सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार व शिवसेनेची ठाम भूमिका असून हे सरकार पाच वर्ष टिकेल असा आपल्याला ठाम विश्वास आहे. असं देखील राऊत यांनी सांगितलं.