Sanjay raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील आणि राज्यातील निवडणुकांवरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच राज्यातील इतर पक्षांची महाविकास आघाडीत काय भूमिका असेल याबाबत भाष्य केले आहे. त्यांनी “देशात लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. विधानसभा निवडणुका हे घेणार नाहीत का? 10 जानेवारीला काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीने त्या पदावर बसले आहेत. निवडणूक आयोग घटनाबाह्य सरकारला पाठबळ देत आहे. ज्या प्रकरणात संसद चालली नाही, लोकं बाहेर पडली होती, त्या प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली. जो न्याय अदानींना मिळतो.. देशातील जनतेला का मिळत नाही? हा प्रश्न आहे. अदानी श्रीमंत म्हणजे भाजप श्रीमंत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
आज सकाळी माध्यमांशी बोलतानासंजय राऊत यांनी,” महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागावाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे. कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटपा संदर्भात काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या आधीच युती झालेली आहे. ती युती असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वंचित बहुजन आघाडीला माहाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नाही. असे यावेळी सांगितले.
तसेच “प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर सकारात्म चर्चा झाली आणि वाटाघाटी करत आहोत. या देशांमध्ये मोदींचे राज्य असू नये या देशांमध्ये लोकशाही टिकावी यासाठी आमच्या बरोबरीने प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आणि देशांमध्ये आवाज उठवतात. प्रकाश आंबेडकर हे फक्त महाराष्ट्राचे नेते नाहीत तर या देशातल्या समस्त वंचित आणि बहुजन समाजाचे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याशी महाराष्ट्रामध्ये अत्यंत सन्मानाने चर्चा होत्या आणि त्यांचा पक्ष महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे.” असे म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या महविकास आघाडीत समावेशाचे पुन्हा एकदा संकेत दिले.
यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रकारे काल निकाल लावला त्यावर आम्ही काही टिप्पणी करणार नाही. कारण आजही न्यायालयाचा निर्णय खाली मान घालून मान्य करायची प्रथा आहे, त्या निकालानंतर अदानी म्हणाले सत्याचा विजय होतो. ज्या प्रकरणात संसद झालेली नाही, लोक रस्त्यावर उतरली, सत्य बाहेर आलं नाही उलट त्यांना क्लीन चीट मिळाली मग हे सत्य इतरांच्या बाबतीत कुठल्या बिळात लपवलं जातं. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊन देखील या विधिमंडळाचे अध्यक्ष निर्णय घ्यायला तयार नाहीत, अशा वेळेला जो न्याय अदानी यांना मिळतो तो न्याय या देशातील नागरिकांना कायदाप्रिय जनतेला का मिळत नाही? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.