– गणेश जोशी
सांगली – राज्यातील भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर सत्तेत येणाऱ्या नव्या महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सांगली जिल्ह्याला जयंत पाटील यांच्या रूपाने उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार यांनी भाजपबरोबर घरोबा करीत उपमुख्यमंत्रिपद मिळवले होते; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली व जयंत पाटील यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने त्यांची उपमुख्यमंत्रिपदी निश्चितपणे वर्णी लागेल, असे ज्येष्ठ राजकीय सूत्राकडून समजते. जयंत पाटील यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली तर तब्बल 10 वर्षांच्या कालावधीनंतर स्व. आर. आर. पाटील यांच्यानंतर हे पद सांगली जिल्ह्याला पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे.
नव्या आघाडी सरकारमध्ये सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे विश्वजित कदम तर शिवसेनेच्या वतीने अनिल बाबर यांचीही वर्णी लागू शकते, असे राजकीय अखाडे बांधण्यात येत आहेत. या तिघांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय सूत्रे पुन्हा एकदा सांगली जिल्ह्याच्या हातात येऊ शकतात.
राज्यात पहिल्यांदाच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर येणार आहे, त्यामुळे या सत्तेत जिल्ह्यात कॉंग्रेस आघाडीला दोन जागा तर शिवसेनेला एक मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे महत्त्व गेल्या तीन चार दिवसांत वाढले आहे. शरद पवारांच्यानंतर पक्षाची सर्व सूत्रे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या हाती असतानाच आता ते गटनेते म्हणूनही पक्षातील अत्यंत वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता असलेल्या जयंत पाटील यांना या पदासह गृह किंवा अर्थमंत्रिपद मिळू शकते तर विश्वजित कदम यांना शालेय शिक्षण किंवा उच्चतंत्रपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे अनिल बाबर यांना पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून समावेश होऊ शकतो. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेच्या काळात जयंत पाटील, आर. आर. पाटील व डॉ. पतंगराव कदम हे तिघे 15 वर्षे मंत्रिमंडळात होते व या तिघांचा संपूर्ण मंत्रिमंडळात दबदबा होता. आता नव्या सरकारमध्येही सांगली जिल्ह्याचा दबदबा कायम राहील, असा कयास बांधण्यात येत आहे.