मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे. कारण पंच प्रभाकर नाईक यांनी केलेल्या आरोपानंतर खात्यांअंतर्गत चौकशी होणार आहे. पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर समीर वानखेडे आणि प्रभाकर साईल यांची अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे.
प्रभाकर साईन यांनी खंडणी केल्याच्या आरोपानंतर आर्यन खान प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. कारण त्यांच्या आरोपानंतर एनसीबीच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. विविध राजकीय नेत्यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानंतर आता समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.
व्हिजिलन्स विभागाकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. याचा तपास संबधित विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. समीर वानखेडे करत असलेल्या तपासाबाबतही पुढे निर्णय होणार आहे. या चौकशीसाठी समीर वानखेडे यांना दिल्लीला बोलवले जाणार आहे. तसेच पंच प्रभाकर साईल यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. या संपूर्ण चौकशीनंतर याचा अहवाल व्हिजिलन्स विभागाकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर समीर वानखेडेंच्या तपासाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी मध्यस्थांमार्फे शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रभाकर साईल यांनी केला होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी म्हटले. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस गप्प होतो, असा दावा साईल यांनी केला होता.