मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हे असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांच्या विधानाचे समर्थन केले होते. दरम्यान, यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी, “देवेंद्र फडणवीस हे सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का करत आहे? हे मला कळलं नाही. सुधांशू त्रिवेदींनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे. किंबहूना सर्वच शिवप्रेमींची माफी मागायला पाहिजे. फडणवीसांनी त्यांचे समर्थन केल्यापेक्षा ते माफी कशी मागतील, याकडे लक्ष द्यायला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वीर सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावर बोलताना एका वृत्तावाहिनीच्या कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली, असे वादग्रस्त विधान केलं होते.
यासंदर्भातला व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला होता. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले असताना “सुधांशु त्रिवेदींचं वक्तव्य मी नीट ऐकलं आहे आणि कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही.” असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून संभाजीराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.