मुंबई – अदानी प्रकरणावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 फेब्रुवारीला संसदेत भाषण करून सरकारवर टोकदार प्रश्नांची सरबत्ती केली. ते लोकसभेत सरकारला भारी पडले. राहुल गांधींच्या भाषणाने सत्ताधारी पक्षाचे चेहरे पिवळे पडले. मोदी हे मोठे हजरजबाबी वक्ते आहेत असे सांगितले जाते मग ते राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे का देऊ शकले नाहीत? असा सवाल शिवसेनच्या मुखपत्रातील अग्रलेखातून मोदी सरकारला विचारण्यात आला आहे.
या अग्रलेखात म्हटले आहे की, आता प्रश्नकर्त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. यालाच हुकुमशाहीं म्हणतात, हा डरपोकपणा सुद्धा आहे. आपण एकटेच विरोधकांना भारी पडलो आहोत अशी डरकाळी मोदींनी संसदेत फोडली, पण प्रत्यक्षात एकटे राहुल गांधी सरकारला भारी पडले आहेत. राहुल गांधी यांनी मैदान मारले व भाजपने रडीचा डाव खेळत त्यांनाच नोटीस बजावली याला पलायनवाद म्हणतात.
या प्रकरणात राहुल गांधी यांनी मोदी-अदानी यांच्या संबंधात जे प्रश्न लोकसभेत विचारले त्याला उत्तर देण्याऐवजी मोदी इधर-उधर की बाते करीत राहिले. गेली सात-आठ वर्षे राहुल गांधी सरकारच्या खिजगणतीतच नव्हते, पण आता मात्र त्यांनी राहुल यांच्या नावाचा धसकाच घेतलेला दिसतो आहे. 7 फेब्रुवारीच्या भाषणात राहुल गांधी यांनी मोदी सरकारची बोटेच छाटली. ते दुखरे हात तोंडावर ठेऊन ते बोंबा मारत आहेत असेही शिवसेनेने म्हटले आहे. मुळात अदानी-मोदी प्रकरणावरून देशाची नाचक्की झाली आहे. पण भाजप त्यावरू डोळ्यावर पट्टी व तोंडावर बोट ठेऊन गप्प आहे असेही त्यांनी म्हटले आहे.