चाफळ -चाफळ गावात तालमीची इमारत नसतानादेखील श्री समर्थ विद्यामंदिराच्या शाळेच्या एका पडक्या खोलीत कुस्तीचे धडे घेऊन तयार झालेली चाफळची सुकन्या पैलवान साक्षी पाटील हिची राष्ट्रीय कुस्तीसाठी मल्ल तयार करणाऱ्या मुंबई येथील साही सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
चाफळ येथे तालीम बांधकामासाठी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई व माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांनी भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. निधी उपलब्ध असताना देखील काही राजकीय पुढाऱ्यांच्या कुरघोडीत तालीम इमारतीचे बांधकाम रखडले आहे. चाफळमधील राजकीय पुढाऱ्यांनी मुलांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन एकत्र येऊन यावर तोडगा काढण्याची गरज आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी लहान मुलांनी श्री समर्थ विद्या मंदिराच्या एका पडक्या खोलीत माती टाकून कुस्तीचा सराव करण्यास सुरुवात केली. मागील वर्षी कोल्हापूर येथे झालेल्या पाच जिल्ह्यांच्या कुस्ती स्पर्धेत चाफळच्या साक्षी पाटील हिने पहिला क्रमांक मिळवला. तिची राज्यस्तरावर निवड झाली होती. सध्या तिची साही सेंटर मुंबई येथे निवड झाली आहे. येथूनच राष्ट्रीय कुस्तीसाठी खेळाडू घडवले जातात.
दरवर्षी श्रीराम नवमी उत्सवात येथे मोठ्या प्रमाणात कुस्त्यांचे मैदान भरवले जाते. मात्र, चाफळ येथील जुनी तालीम इमारत पूर्णपणे मोडून टाकल्याने सध्या ती जागा वापराविना पडून आहे. त्यामुळे चाफळसह भागातील मुलामुलींना कुस्तीचा सराव करण्यासाठी नवीन तालीम बांधण्याकरिता उत्तरमांड नदीवरील घाटाशेजारी देवस्थानची जागा सूचवण्यात आली. तसेच देवस्थानाने देखील जागा देण्यास होकार दिला होता.
ग्रामपंचायतीने त्यासाठी लागणारे ठराव देण्याचे मान्य केले. त्यानुसार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व माजी अर्थ व शिक्षण सभापती राजेश पवार यांनी चाफळ तालमीकरिता सात लाखांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, काही राजकीय नेतेमंडळी यांनी नियोजित ठिकाणी तालीम बांधण्यास विरोध दर्शवल्याने तालमीच्या इमारतीचे बांधकाम थांबले आहे.
दानशूरांना झाला विरोध
चाफळ येथील विजयसिंह पाटील व उत्तमराव पाटील यांनी देखील तालीम बांधण्यास एक एक गुंठा जागा दिली होती. त्याला देखील काहींनी विरोध केला. राजकीय पुढाऱ्यांच्या अडमूठ धोरणाचा फटका तालमीला बसला आहे. इमारत नसल्याने वस्ताद प्रदीप बाबर, दिलीप साळुंखे, संजय पाटील, मारुती साळुंखे, संतोष तिकुडे, आनंदा महिपाल, महेश साळुंखे, संभाजी बाबर, प्रमोद पाटील, विलास मोरे यांना पडक्या खोलीत शिक्षण द्यावे लागत आहे.