Narendra Modi | Satara News | Lok Sabha Election 2024 : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, निवडणुकीला देखील आता चांगलाच रंग चढला आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.
महायुतीतून खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात अनेक सभांचे आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान मोदींच्या आज आणि उद्या ६ सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा सोलापूरमध्ये पार पडली असून, त्यानंतर दुसरी सभा साताऱ्यातील कराड येथे झाली.
साताऱ्यातील कराड येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर गंभीर आरोप केले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, ‘सातारा देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्रांपेक्षा कमी नाही.
उदयनराजेंना तुम्ही येथे उमेदवार बनवले. साताऱ्यात भगवा फडकत राहिला आहे, आणि फडकत राहिला आहे. मी आज तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही तुमच्या सेवकावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मी आज इथे आलो आहे. एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनी आल्या आहेत.
ते पुढे म्हणाले, ‘साताऱ्याची ही भूमी शौर्याची भूमी आहे. आज मिलिट्री आपशिंगे गाव असो किंवा साताऱ्याचा कोणतही सैनिक परिवार असेल, आत्मनिर्भर भारतीय सेनेला पाहून ते सर्वात जास्त आनंदी आहेत. आपल्या सेनेकडे आज एकापेक्षा एका भारतीय बनावटीचे हत्यार आहेत.
आता तुम्हीच सांगा, असे कामे करुन मोदींनी ज्यांची दुकाने बंद केली ते खूश होतील का? हत्यारांच्या ज्या दलालांना काँग्रेसचं सरकार खूप चांगलं वाटतं होतं ते मोदीची वाहवाह करतील का?”, असे प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केले.
मी तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामांसाठी करतो. त्यातून मी तुमच्याशी संवाद साधतो. तुमच्यापर्यंत पोहचून गरजा जाणून घेतो. त्यातून योजनांची माहिती देतो, असे सांगून विरोधक मात्र समाजात तेढ निर्माण करण्यासाठीच सोशल मीडियाचा वापर करत असल्याचा आरोप मोदींनी केला.
विरोधकांकडून मात्र फेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. त्या व्हिडिओत माझा, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आवाज असतो. ते व्हिडिओ एआयच्या माध्यामातून तयार केले जातात. आमच्या तोंडत नको ते विधाने टाकले जात आहेत.
त्यांना माहिती आहे की शांततापूर्ण निवडणूक होते, तोपर्यंत त्यांची डाळ शिजणार नाही. त्यामुळे येणाऱ्या महिन्याभरात काही ना काही मोठे कांड होण्याची शक्यता आहे. त्यातून विरोधक आपले इरादे पूर्ण करण्याचे प्रयत्न करतील, असा गंभीर आरोप मोदींनी केला.