निसर्गचक्राची परिक्रमा करताना अखेरचा मास फाल्गुनपाशी पाय आपोआपच रेंगाळतात. याचं कारण त्याचं मुग्ध रूप. सृष्टीच्या तारुण्याचा बहर म्हणजे फाल्गुन! कोणत्याही माणसाला तारुण्याच्या चीर आठवणींचं स्मरण करून देणारा असा हा मास आहे. आत्यंतिक प्रणय आणि पराकोटीचा शोक हे तारुण्याचं वैशिष्ट्य असावं.
सृष्टीचा भर तारुण्याचा बहर म्हणजे फाल्गुन! मस्त मनमौजी सदातरूण असा फाल्गुन! वसंताच्या पूर्णरूप वैभवाचा, नादमय पायातील झुमझुमणाऱ्या पैजणांच्या घुंगुरनादाचा फाल्गुन! पौषाची धुसरता, माघाची अबोलता, निस्तब्धता सारं काही संपून पूर्ण तारूण्याचा रंगीला फाल्गुन! कोणत्याही मनुष्याला सुनहऱ्या तारुण्याची चिर आठवण करून देणारा हा निसर्ग तसाही मायावीच आहे. त्याच्या प्रेमात त्याने आजवर अनेक कवीवरांना, लेखकांना भारून ठेवलं आहे. बंदिस्त केलेलं आहे.
माणसाच्या स्वभावाप्रमाणे प्रत्येक स्वभावाची छाया निसर्गत: मिळते. रात्रीच्या निरभ्र आभाळात कोणतंही लक्षण नसताना, झाडांच्या शेंगा टपटपत राहतात आणि पावसाचा आभास निर्माण करतात. वाढत्या उन्हाच्या माऱ्यानं मृगजळं तयार होऊन डोळ्यांना भ्रमित करतात. पक्ष्यांच्या गळयातील किरटेपण कमी होऊन त्यांच्या मधुर स्वरांनी वातावरण प्रणयार्त बनतं. कोकिळेचा प्रणयी स्वर सुटत नाही. पण याही वातावरणात त्यांचं भान ध्यानात ठेवण्यासारखं आहे. संयमाचं महत्त्व जणू त्यांच्या नसानसात भिनलं आहे.
छायाप्रकाशात स्तब्धता, नाद खरे आणि कथित, सारे एकमेकांत बेमालूमपणे विरघळलेलं असतं. वसंतोत्सवासाठी मंदिराकडे जाणारी पहिली पायरी म्हणजे फाल्गुन. नंतर चढत्या क्रमानं सुखाकडे, प्रणयाकडे वाटचाल करणारे ऋतु सृष्टीच्या भर तारुण्यातल्या बहराचे दिवस क्षणात प्रखर उन्हानं कासावीस करणारे तर क्षणात थंडगार वाऱ्याची शीतलता, आल्दादकता प्रदान करणारे, प्रणयाच्या ऐन उन्मादाच्या क्षणीही संयमित कालपूर्ण आनंदठेव म्हणून जपणारे हे पक्षी जणू काही असाच संदेश आपल्याला देतात की, आयुष्यातला आनंदाचा ठेवा मनमुराद लुटा, पण मनावरचा ताबा कोणत्याही परिस्थितीत सुटू देऊ नका. आत्यिंतक प्रणय आणि पराकोटीचा शोक हे फाल्गुनाचं स्वभाव वैशिष्ट्य असावं, असं वाटतं. दुपारच्या गंभीर, शांत वातावरणात आठवणीत गेलेल्यांचं स्मरण दुखावतं.
असं वाटतं की, ही शांत दुपार जणू भूतकाळाचं स्मरण करावं यासाठीच आहे. झाडांची पानगळ सुरू असली तरी नादरहित असते. स्मरणातून जवळ येणारे किंवा असणारे हे क्षण ही दुपार घेऊन येते. कोवळे भावबंध अजून तरल आणि पारदर्शक करते. प्रौढ वयातसुद्धा डोळ्यांत पाणी जमा करण्याचं धारिष्ट्य दाखवतं. अंगणातल्या झोपाळ्यावर बसावं आणि खुशाल आठवणीत रमावं. नवा झोका उंच जातो तेव्हा जे आयुष्यात येऊ शकले नाहीत त्यांना हात लांब करून आपल्याकडे ओढावं. त्यांची इच्छा असली तर एक झोका त्यांच्यासवे झुलावा आणि पुन्हा भानावर यावं. आपापल्या वाटेनं चालू लागावं. अशी आठवणींना उजाळा देणारी फाल्गुनी दुपार रंगीत बनते.
संध्याकाळी नावीण्याची आत्यंतिक ओढ स्वप्नांच्या राज्यात आपल्या आगमनासाठी आतूर बनते. आकाशातल्या निरनिराळ्या रंगांनी उजळत जाणाऱ्या चंद्रकोरी, धुवट निळसर आकाशात उगवणारी प्रत्येक चांदणी मनाला आतूर बनवते. सुंदर संध्याकाळ दुपारच्या विरहाचा मागमूस नाहीसा करते. म्हणूनच वाटतं की, आचंबिक ओढ आणि आत्यिंत्यक विरह हीच खरी फाल्गुनाचं स्वभाव वैशिष्ट्य असावीत.
साऱ्या दुपारभर जाणवलेला मना-शरीरावर पसरलेला उदासपणा संध्याकाळी कमी होऊ लागतो. पाखरांच्या गळ्यातून झिरपणारे स्वर, पंखांच्या फडफडण्यातून निर्माण झालेले स्वर संगीतात आपोआप मिसळतात. झाडाझाडांतून पुढे येणाऱ्या वसंताच्या आगमनाची वर्दी देतात; पण या साऱ्यासाठी दुपारचं विरहीपण भोगावंच लागतं.
आताच नाहीतर फार पूर्वीपासून निसर्गापासून मानव वेगळा झाला नाही. देवानं निर्माण केलेल्या या सृष्टीचा आपण एक हिस्सा आहोत. पशू, पक्षी, प्राणी, मानव या साऱ्यातून निसर्गाचा जिवंत स्रोत झिरपत असतो. या निसर्गाच्या प्रगटीकरणातून, आविष्कारातून आपल्याच भावभावना प्रकट होत असतात. जितकं आपण निसर्गाच्या जवळ जातो तितका तो आपला सखा बनतो. प्रत्येकाच्या स्वभाव वैशिष्ट्याचं चित्रण निसर्गात आढळतं. म्हणून ईश्वराला महान जादूगार म्हटलं जातं. विविधतेत एकता असते. साधारणत: शहरीकरणामुळे वृत्तीत फरक पडला. पण मनाचा गाभा, अंर्तनादातला निसर्ग जागाच राहीला. जगण्याला कोवळीक देत गेला. म्हणूनच कितीही कार्यमग्न असलं तरी तुबदलांची जाणीव व्हायला एक लहानशी वाऱ्याची झुळुक देखील पुरेशी असते. स्वत: येऊन निसर्गाशी आपल्या नात्याची विण पुन्हा-पुन्हा गुंफते. म्हणूनच गवताचं वाऱ्यासवे हलणारं पातं, पूर्व-पश्चिमेचं लाजरं आकाश, रात्रीतलं निळंभोर आकाश, तरूण उन्मादक आकाश मनाला मोहवितं.
लोकगीतात रंगिल्या फाल्गुनाचं वारेमाप कौतुक आढळतं. हिंदी साहित्यात फाग गीतं विशेषत्त्वानं लोकप्रिय आहेत. या महिन्यात येणाऱ्या होळी या सणानं या महिन्याची लज्जत वाढलेली आहे. रानोमाळ फुललेला पळस स्वत: विरागी रंग जरी धारण करित असला तरी प्रेमीजनांना आपल्या रंगात रंगवून टाकतो. याच्या केशरी फुलांचा पाण्यात भिजवून रंग तयार करतात आणि तो रंग आपल्या आवडत्या व्यक्तीवर उधळतात. त्यात एक वेगळीच खुमारी असते. वर्षभर आपण स्वत:ला या तुंच्या माध्यमातून शोधत असतो. आता या भेटीचा पूर्णविराम? छे हा तर स्वल्पविराम. पण आनंद ऋतुचक्राची परीक्रमा केल्याचा निश्चितच आहे.
-अरुणा सरनाईक