मावळतीचे एक पर्व संपून उगवतीचे नवे पर्व सुरू होणे ही निसर्गात अखंडितपणाने चालणारी प्रक्रिया. पण तरीही कालगणनेनुसार येणाऱ्या वर्षारंभाचे स्वागत जगभरात केले जाते. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षाच्या स्वागतासाठी भारतासह जगभरात जल्लोष केला जातो. पण ही परंपरा कधीपासून सुरू झाली असावी? प्रचलित कॅलेंडरचा शोध लागण्यापूर्वीही अशा प्रकारे आनंदोत्सव साजरा होत होता असे म्हटले जाते. जसा देश, जसा समाज, तसा त्यांचा नवं वर्ष साजरं करण्याचा दृष्टिकोनही वेगळा. म्हणूनच प्रत्येकाच्या पद्धतीत फरक आणि जल्लोषात वैविध्य. पण हाच जल्लोष करताना आपण मात्र साऱ्याची भेळ केली.
माणूस… या विश्वातला एक असा घटक, जो कामाच्या रोजच्या रगाड्यात स्वत:ला लोटून देतो. पण त्यातला तोचतोचपणा त्याचा जीव घेतो, त्याच त्या जगण्याचा त्याला कंटाळा येऊ लागतो. मग तो शोधतो एक नवी पालवी, तो शोधतो जगण्याचे नवे मार्ग. त्याला हवा असतो काहीसा दिलासा… त्यातूनच मग थोडं जरी वेगळं घडलं, तरी तो करतो त्याचं सेलिब्रेशन. आणि दु:ख असेल, तर त्याचं भांडवलंही. पण सध्या जगभरात वाढलेल्या ताणामुळे माणूस स्वत:साठी छोट्या-छोट्या गोष्टींतूनही आनंद शोधू लागलाय. जगण्याला नवा अर्थ देण्यासाठी त्याला सापडलीय एक नवी युक्ती, ज्यात तो स्वत:ला हरवून टाकतो. मग ते नव्या वर्षाचं सेलिब्रेशन असो, लग्नाची धूमधाम असो, कुणाचा वाढदिवस असो की मित्राचं प्रमोशन असो, या आनंदाला सेलिब्रेशनशिवाय त्याला मार्गच सापडत नाही. आणि ही फक्त आपल्या भोवतालच्या नाही, तर जगभरातल्या माणसाची सवय बनलीय.
काय आहे इतिहास?
नवं वर्ष साजरं करण्याच्या परंपंरेचा इतिहास फार जुना आहे. केवळ कॅलेंडर सुरू झाल्यानंतरचा नाही. तब्बल चार हजार वर्षांपूर्वी बेबिलोनियन समाजातले लोक नवीन वर्षाचं स्वागत करायचे. आजच्या कॅलेंडरनुसार सांगायचं झालं, तर त्या वेळी 21 मार्चला हा उत्सव करायचे. वास्तविक, तो दिवस वसंताच्या आगमनाचा असायचा. साऱ्या सृष्टीला पालवी फुटलेली असायची. नवा आल्हाददायक वारा आसमंतात सुटलेला असायचा आणि निसर्गात काही बदल होतोय, त्याचं आपण स्वागत करायला हवं, या कल्पनेनं ती मंडळी हा जल्लोष करायचे. पारंपरिक नृत्य करायचे आणि या बदलाचं स्वागत करायचे. त्यानंतर आलेल्या प्राचीन रोमन कॅलेंडरमध्ये मात्र 10 महिनेच असायचे आणि त्याचा प्रारंभ एक मार्चला व्हायचा. बराच काळ लोटल्यानंतर इसवी सन पूर्व 713 च्या दरम्यान या कॅलेंडरला जानेवारी आणि फेब्रुवारी महिने जोडले आणि कॅलेंडर बारा महिन्यांचं झालं. तरीही नवं वर्ष मात्र एक मार्चलाच सुरू होई. इसवी सन पूर्व 153 ला मात्र एक जानेवारी हीच तारीख वर्षारंभासाठी योग्य असल्याचं ठरलं. इसवी सन पूर्व 45 मध्ये रोमचा बादशहा ज्युलियस सीझर यानींही ही परंपरा कायम ठेवली. या नव्या वर्षाचं स्वागत मात्र इसवी सन 1582 मध्ये ग्रेगेरीयन कॅलेंडर तयार झाल्यानंतर सुरू झालं. ते आजतागायत सुरूच आहे. आता ते थांबेल असं वाटत नाही. ग्रेगरीनेच या कॅलेंडरमध्ये लीप वर्षाची संकल्पना आणली.
भारतात कधी साजरे होते नवे वर्ष?
भारतातही वेगवेगळ्या समाजाचे नवीन वर्ष वेगवेगळ्या तिथीला साजरे केले जाते. त्याला निसर्गातील बदलांचे अधिष्ठान आहे. म्हणजेच भारतीय समाज मुळातच निसर्गाला देवता मानणारा समाज आहे. आसाममध्ये नवे वर्ष बिहू म्हणून साजरे केले जाते, तर केरळमध्ये पूरम विशू म्हणून साजरे होते. तमिळनाडूत पुत्थांडू, आंध्र प्रदेशात उगादी, महाराष्ट्रात गुढीपाडवा, तर बांगलादेशात बैसाखी म्हणून नवीन वर्ष साजरं केलं जातं. शीख बांधव नानकशाही कॅलेंडरनुसार 14 मार्चला नवं वर्ष साजरं करतात. पण यातही एकता अशी आहे की भारतात जवळपास सर्वच ठिकाणी मार्च ते एप्रिल या दोनच महिन्यांत नवे वर्ष साजरे केले जाते. कारण याच महिन्यांत सृष्टी बहरलेली असते.
याच महिन्यांत वातावरणात, निसर्गात नवचैतन्य आलेलं असतं. सृष्टीतच नव्याची नवलाई सुरू असते, म्हणून ते नवं वर्ष, अशी धारणा भारतात आहे. त्यातही चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसाला नव्या पर्वाची सुरुवात करण्याची परंपरा मोठी आहे. गुढीपाडवा, सिंधी समाजाचा चेटीचंड उत्सव, उगाडी हे एकाच दिवशी साजरे होतात. तर गुजराती लोक दिवाळीला आपलं नववर्ष साजरं करतात.
जगभरात कसा होतो नववर्षाचा जल्लोष
अजूनही सूर्यकालगणना मानणारे रशिया, जॉर्जिया, जेरूसलेम आणि सर्बिया हे देश मात्र रोमन कॅलेंडरच प्रमाण मानतात आणि त्यानुसार 14 जानेवारीला वर्षाचा प्रारंभ करतात. जगभरात मोठ्या प्रमाणात असलेला हिब्रू समाज मात्र नवीन वर्ष सात दिवस साजरे करतो. आपण वापरतो त्या, म्हणजेच ग्रेगरीयन कॅलेंडरनुसार त्यांचं हे नववर्ष 5 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या काळात येतं. देवाला विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी सात दिवस लागले, म्हणून हा उत्सव सात दिवस करायचा अशी या समाजाची धारणा आहे. तर मुस्लीम समाजाच्या कॅलेंडरला हिजरी म्हणतात. त्यांच्या नववर्षाचा पहिला दिवस मोहर्रम महिन्याचा पहिला दिवस असतो. हा समाज चांद्रकालगणना मानणारा असल्याने चंद्राच्या बदलानुसार त्यांचे सण-उत्सव ठरतात. चिनी समाजही चांद्रकालगणना मानतो, त्यामुळे त्यांचेही नववर्ष आपल्या कॅलेंडरनुसार साधारणत: 21 जानेवारी ते 21 फेब्रुवारीपर्यंतच्या काळात येते. थायलंड, कम्बोडीया, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका हे आपले शेजारी देश 14 एप्रिलला नवं वर्ष साजरं करतात.
प्राचीन फ्रान्समध्ये एक एप्रिलला नवं वर्ष साजरं करण्याचा प्रघात होता. प्राचीन जर्मनीत 29 जूनला, तर प्राचीन अमेरिकेत तर एक जुलैला आणि म्यानमारचे 21 जुलैला. मात्र, काळाच्या ओघात त्यांनीही जगभरात वापरली जाणारीच कालगणना स्वीकारली. ज्यामुळे तिथंही आता एक जानेवारीलाच नवं वर्ष साजरं केलं जातं, तेही धूमधडाक्यात.
कसं करतात नववर्षाचं स्वागत?
त्या रात्री घड्याळात बारा वाजण्याचीच सारं जग वाट पाहात असतं. प्रत्येकाचं लक्ष फक्त काट्यावर आणि एकदाचे बारा वाजले की जगभर त्याचा जल्लोष सुरू होतो. प्रत्येक जण इतरांना शुभेच्छा देत नाचत त्या वर्षाचं स्वागत करतो. काही जण हॉटेलांत, तर काही जण पबमध्ये. काही जण निसर्गरम्य ठिकाणी कुटुंबासोबत, तर काही जण मित्रमैत्रिणींसोबत. प्रत्येकाचा प्लॅन वेगळा, प्रत्येकाचा रंग वेगळा. पण तरीही काही देशांत नवं वर्ष साजरं करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
अमेरिकेत रात्रभर पार्ट्यांचा धिंगाणा सुरू असतो, त्यानंतर सकाळी नववर्षाचं स्वागत केलं जातं. तर चीनमध्ये एक जानेवारीऐवजी 17 जानेवारी ते 19 फेब्रुवारीदरम्यान येणाऱ्या एका दिवशी नवं वर्ष साजरं केलं जातं. त्या रात्री आकाशात चंद्र पाहिला जातो. त्याचं दर्शन घेतल्यानंतर विविध नृत्यमहोत्सव आयोजित करून वर्षाचं स्वागत केलं जातं. स्कॉटलंडमध्ये नव्या वर्षाला केसार म्हटलं जातं. तिथल्या गावांमध्ये रस्त्यांवर रॉकेलच्या बॅरलला आग लावून लोटून दिलं जातं. त्याचा अर्थ असा की जुन्या वर्षाला पेटवून नष्ट केलं, आता नव्या वर्षाला येण्याची वाट मोकळी झाली आहे. ग्रीसमध्ये या नव्या वर्षाच्या स्वागताच्या महोत्सवाला सेंट बासिल म्हटलं जातं. तिथं लहान मुलं आपल्या जुन्या चपला, जुने बूट रस्त्यावर आणून सोडतात. यासाठी की नवं वर्ष घेऊन येणारा सेंट बासिल आपल्याला काही तरी घेऊन येईल आणि ते आपल्या चपला, बुटांमध्ये ठेवून जाईल.
यहूदी नव्या वर्षाच्या स्वागताला रोश हशानाह म्हणतात. ते जुन्या वर्षातील चुकांची उजळणी करतात आणि त्या परत घडू नयेत यासाठी प्रार्थना करतात. त्याचबरोबर नव्या वर्षात काही चांगल्या गोष्टी करण्याचाही संकल्प करतात. इराणी मात्र अजूनही आपले नव वर्ष मार्चमध्येच साजरं करतात. ते सूर्यकालगणनाच मानतात आणि या कालगणनेनुसार नव्या वर्षाची सुरुवात फक्त वसंताच्या आगमनानेच होते, यावर त्यांची ठाम श्रद्धा आहे. तर जपानमध्ये नवे कपडे घालून एकमेकांना शुभेच्छा देणं हीच नव्या वर्षाची योग्य सुुुरुवात मानली जाते.
आपण काय करायचं, ते आपण ठरवायचं
जसा देश, जसा समाज, तसा त्यांचा नवं वर्ष साजरं करण्याचा दृष्टिकोनही वेगळा. म्हणूनच प्रत्येकाच्या पद्धतीत फरक आणि जल्लोषात वैविध्य. पण हाच जल्लोष करताना आपण मात्र साऱ्याची भेळ केली. सर्वांचं थोडं थोडं घेऊन आपण केवळ धिंगाणा सुरू केलाय असं दिसतं. जल्लोष करता येतो, पण त्यातही नजाकत असावी, त्यातही सर्वांना आनंद घेता यावा, ही भावना असली, तर हा उत्सवही खऱ्या अर्थाने महोत्सव होईल.
– विनिता शाह