आपल्या भारत देशाची संस्कृती ही समाजप्रधान आहे. आपण सर्वजण या समाजाचा एक महत्त्वाचा दुवा आहोत. समाज हा कुण्या एकट्या प्रजातीने किंवा धर्माने बनलेला नसतो. सर्वांचे योगदान अत्यंत गरजेचे असते. म्हणून त्यावर एक सुंदर वाक्य आहे जे सर्वश्रुत आहे ते म्हणजे आपण समाजाचे काही देणे लागतो. याचा सरळ साधा अर्थ म्हणजे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाने आपणास खूप काही दिलेले असते त्यांचे एका अर्थाने कर्ज हे आपल्यावर असते, अशा समाजाला आपण आपल्या परीने पुढे नेण्याचे काम, त्याला सक्षम बनवण्याची जबाबदारी ही प्रत्येक सुजाण नागरिकाची असते. व त्यात काही चुकीचे आहे अस आपण म्हणू शकत नाही.
अजून एक वाद जो मागील कित्येक दशके चालत आलेला आहे की, आपला हा समाज हा स्त्री प्रधान आहे की पुरुषप्रधान आहे. खर सांगायचे झाले तर समाज हा सर्व घटकांनी बनलेला असतो त्यामध्ये प्रथम स्थान, दुय्यम स्थान असा भेदभाव करणे मुळात चुकीचा आहे. आता साधे उदाहरण घ्यायचं झाल तर… प्राण्यांमध्ये स्वभाव गुणधर्म आढळतो त्यात काही प्राण्याचा स्वभाव हा रागीट, तापत, उग्र असतो तर काही प्राणी हे प्रेमळ, मृदू स्वभावाचे असतात. असा विरोधाभास असला म्हणून ते समाजाचा भाग होण्यास पात्र नाहीत. असं आपण म्हणतो का? नाही हो ना… तसच समाजाचे आहे. सामाजिक सलोखा जपण्याचे काम हे समाजातील प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे याचे भान असणे खूप महत्त्वाचे आहे.
भारतीय संस्कृती ही कितीतरी दशके जुनी चालत आलेली संस्कृती आहे. जसा आपल्या भारतीय संस्कृतीत बदल होत गेला त्याचप्रमाणे समाजातसुद्धा बदल होत गेले. पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टीचा प्रभाव मात्र समाजावर अजूनही स्पष्ट दिसून येतो. ज्या अघोरी रूढी परंपरा समाजासाठी घातक आहेत त्याचा पगडा, विळखा अजूनही समाजाच्या काही भागात जास्त पाहावयास मिळतो. अंधश्रद्धा ही समाजाच्या विकासाला लागलेली एक कीड आहे असं म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अंधश्रद्धेच्या या प्रवाहात काही समाज हा पूर्णतः बुडालेला आहे व त्याचे दुष्परिणाम किती घातक आहेत हे आपण वृत्तपत्र, वाहिन्या यावर वाचत, पाहात आलेलो आहोत.
अंधश्रद्धेमुळे समाजातील लोकांचे पडणारे नाहक बळी मनाला खूप चटका लावून जाणारे असतात. ह्या सर्व घटना समाजासाठी खूप मारक असतात हे आपण सर्वजण जाणतो. समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अंधश्रद्धा याला आवर घातलाच पाहिजे. भारत सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी व्यापक पावले उचलत आहेत ही खूप आनंदाची व समाधानाची बाब आहे. खासगी संघटना पणं यामध्ये सामाजिक परिस्थिती जाणून त्यात आपले मोलाचे सहकार्य देताना दिसून येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विविध कार्यक्रमातून लोकांमध्ये जनजागृती होत आहे व या विनाशकारी व्याधीतून समाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहेत.
समाज हा विविध घटकांची जोड आहे त्यामुळे समाजाची परिस्थिती ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असते. सर्व जाती धर्माचे लोक आपल्या भारत देशात गुण्यागोविंदाने एकत्र राहत आलेले आहेत. समाजात असे काही लोक आहेत जे समाजविरोधी कारवाया करण्यात धन्यता मानतात. काही समाजकटकांना हाताशी धरून समाजात राग, द्वेष, दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे परिस्थिती चिघळते. समाजविरोधी घटकांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी सरकारकडून दखल घेतली जाते व त्यावर नियंत्रण मिळवले जाते. सामाजिक परिस्थितीचे भान राखून योग्य निर्णय घेतला जातो त्यामुळे काही प्रमाणात अशा देशविरोधी सामाजिक कारवायाला अंकुश बसत आहे.
समाजाची आधुनिकतेच्या दिशेने होणारी वाटचाल ही भविष्यात होणाऱ्या परिवर्तनाची नांदी आहे. समाजात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्याचा फायदा सर्व स्तरातील लोकांना होताना दिसत आहे. समाजाला शिक्षणाचे महत्त्व कळू लागले आहे त्यामुळे देशाच्या साक्षरतेचे प्रमाणही झपाट्याने वाढत चालले आहे. लोकांची विचार करण्याची क्षमता वाढीस लागली आहे. काय बरोबर आहे काय? चुकीचे आहे? याची समाजाला जाण झाली आहे. निरक्षरता हे जुनाट अस्त्र आता काही कामाचे राहिले नाही.
देशाच्या विकासाची सुरुवात ही समाजापासून होते हे आता आपल्या देशाला कळले आहे. त्याच मार्गाने देश आंतरराष्ट्रीय पातळीवर पणं आपला ठसा उमटवत आहे. समाजाचे मोलाचे सहकार्य सरकारला लाभत आहे त्यामुळे जगात आपल्या भारत देशाचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. भारतीय सामाजिक संस्कृतीचे महत्त्व अन्य देशांच्या लक्षात आले आहे. आपल्या समाजाने इच्छित ध्येय गाठले आहे अस म्हणून चालणार नाही. समाजात अजूनही काही प्रमाणात विषमता आहे पणं हेही विसरून चालणार नाही की या सर्व गोष्टींची सुरुवात जशी समाजातून झाली आहे तसा त्याचा शेवट समाजातूनच होणार आहे. थोडा विलंब होईल हे ही आपण मान्य करायला हवे व आपल्याकडून होईल तेवढे प्रयत्न करायला हवेत. कारण ही तर फक्त सुरुवात आहे, विकासाची, प्रगतीची व येणाऱ्या आधुनिक सामाजिक परिवर्तनाची…
– स्वप्निल नाईक