मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री पद्मा विष्णू गोळे यांचा 12 फेब्रुवारी रोजी 25 वा स्मृतिदिन. त्यानिमित्त…. मराठी काव्याच्या परंपरेत अर्वाचीन व आधुनिक काव्यात अनेक कवयित्रींनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. यापैकी एक म्हणजे कवयित्री पद्मावती विष्णू गोळे! पण त्या पद्मा गोळे या नावाने सर्वांना परिचित होत्या. त्यांचा जन्म 10 जुलै 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सरदार पटवर्धन यांच्या घराण्यात झाला.
सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्या पाच मजली वाड्यात त्यांचे बालपण गेले. त्यांच्या वाड्यात हरिविजय, भक्तीविजय या ग्रंथांचे वाचन चालत असे, त्याचा नकळत परिणाम त्यांच्यावर झाल्याने त्यांना काव्य करण्याची स्फूर्ती आली. परशुराम पटवर्धन हे त्यांचे वडील तर सरस्वतीबाई पटवर्धन या त्यांच्या मातोश्री. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या मातोश्री त्यांना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत घेऊन आल्या.
पद्माताईंचे शालेय शिक्षण पुणे येथील शनिवार पेठेतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळा येथे झाले. या शाळेत त्यांना सुप्रसिद्ध साहित्यिक विभावरी शिरूरकर (मालतीबाई बेडेकर) या शिक्षिका म्हणून लाभल्याने मराठी साहित्याचे उत्तम संस्कार झाले. या शाळेत त्यांना संजीवनी मराठे या सारखी कविता करणारी जिवाभावाची मैत्रीण लाभल्याने, कवितेच्या सोबतीने ही मैत्री अधिकच बहरली. पुढे त्या मराठी विषयात एम.ए. झाल्या. सन 1932 मध्ये त्यांचे आत्येभाऊ विष्णू चिंतामण गोळे यांच्या बरोबर प्रेमविवाह झाला व पद्मावती परशुराम पटवर्धन या पद्मावती विष्णू गोळे झाल्या. सन 1947 मध्ये त्यांचा प्रीतीपथावर हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध करून काव्यगगनात आपलं स्थान त्यांनी अढळ केलं.
या काव्यसंग्रहाच्या मनोगतात त्या म्हणतात, महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात मी काव्याच्या रूपाने पहिलेच पाउल टाकत आहे, पण शारदेवरील भक्ती व रसिकांच्या सहृदयतेवरील विश्वास या मुले मी काव्यलेखन करते. त्यांच्यावर कवी गोविंदाग्रज, भा. रा. तांबे, रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्याचा संस्कार झाल्याने मराठी साहित्यात त्यांच्या काव्याला एक वेगळेपण प्राप्त झालं. त्यांच्या काव्यात प्रीती, समता व स्वातंत्र्य या मूल्यांचं आकर्षण अगदी प्रामुख्याने जाणवत. स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे याचं भान त्यां कवितेत ठेवून, निखळपणे जगण्याचा समतोल विचार कवितेतून देतात. प्रियकर-प्रेयसीच्या नात्याबरोबर, त्या घरातील मुलं, सुना, लेकी, नातवंड, गृहिणी ही नातीही हळुवारपणे जपतात.
युगंधरा मी नव्या युगाची
मानवतेची गाईन गाणी
असं म्हणणारी आधुनिक स्त्री ही त्यांच्या कवितेत दिसते, तर
बाळ चाललासे रणा
घरा बांधिते तोरण
असं म्हणणारी गोंधळलेली साशंक आईही त्यांच्या कवितेतून दिसते. तर स्त्रित्वावर परंपरेने चढवलेला मुलामा त्या कवितेद्वारे खरवडून काढतात व पुकारा करतात.
नाही मी नुसती मादी
मी माणूस, माणूस आधी
निहार (1954), स्वप्नजा (1962), आकाशवेडी (1968), श्रावणमेघ (1988) हे त्यांचे प्रसिद्ध असलेले इतर काव्य संग्रह. त्यांच्या माझ्या पाठच्या बहिणी, आईपणाची भीती, चाफ्याच्या झाडा, मी माणूस, लक्ष्मणरेषा, आम्ही कुलीनांच्या कन्या, कधी कधी होऊन उर्वशी इ. कविता या लक्षणीय असून, या कवितेतून त्यांनी स्त्रीचं भावविश्व केंद्रस्थानी साकारल आहे. त्यांच्या निहार या काव्यसंग्रहातील सकाळचे वर्णन करणाऱ्या एका कवितेतून स्वभावोक्ती अलंकार प्रकट होतो.
ये अवखळ पोरी समान आज सकाळ
तोडीत गळ्यातील सोन्याची फुलमाळ
नादात वाजवीत अपुले पदीचे चाळ
घरट्यातून उडवी खगास हीच खट्याळ
तर शेवटच्या कडव्यात त्या लिहितात.
सुमनापरि निर्मळ हसुनी जगा हसवावे
अन विहंग होऊन आकाशी विहरावे
या लीन तृणाला दव बनुनी हसवावे
अन माझ्यातुनी मी निसटून सकाळ व्हावे
निसर्ग प्रतिमातून मानवी भावनांचा आविष्कार केल्यामुळे निसर्गाच्या घटकांना वेगळ वजन प्राप्त झाल्याचे कवितेतून दिसते. त्यांनी काव्यलेखना बरोबर नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र, स्वप्न या नाटिका व वाळवंटातील वाट ही कादंबरी लिहिली. त्यांच्या काही कवितेतून ना. ग. गोरे, अच्युतराव पटवर्धन व एस. एम. जोशी यांच्या सारख्या समाजवादी विचारवंतांचे विचार नकळत प्रकट होतात. त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे आंतरयामी, खंबीर, कणखर होण्यासाठी परक्याची पाऊलवाट मान्य नसणारी कवयित्री! स्त्री प्रेमाचे विविध पैलू, विपुलतेने व समरसतेने दाखवून, नव्या युगातील स्त्रीचा वस्तुनिष्ठ आणि तेजस्वी आदर्श समोर ठेवून समाजवादाचा पुरस्कार करणं ही त्यांच्या कवितेची वैशीष्ट! त्यांचा साहित्यिक कार्याप्रमाणे सामाजिक कार्यातही सहभाग होता. पुणे येथील साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.तसेच गोवामुक्ती आंदोलनात शुश्रुषा पथकात त्यांचा सहभाग होता. 12 फेब्रुवारी 1998 रोजी पुणे येथील पाषाण भागात वयाच्या 84 व्या वर्षी काव्यगगनातील ही तारका कायमची विसावली. संसाराचा तोल सावरत अनेक नाती जपताना मानवतेचा दीप अखंड तेवत ठेवून जीवनाची वाटचाल करणाऱ्या या कवयित्रीस 25 व्या स्मृतिदिनानिमित्त वंदन!
– अमेय गुप्ते