सातारा – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यां सोबत शिवजयंतीपर्यंत (19 फेब्रुवारी) बैठक होऊन, अन्यायकारक शासन निर्णय रद्द न झाल्यास कोणत्याही तारखेपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
श्रमिक मुक्ती दलाच्या 43 व्या वर्धापनदिनी जांभगाव, ता. सातारा येथे झालेल्या 27 व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. संघटनेचे उपाध्यक्ष आणि आदिवासी नेते वाहरू सोनवणे, मोहन अनपट, संतोष गोटल, डी. के. बोडके, हरिश्चंद्र दळवी, नजीर चौगले, श्रीपती माने, निकम गुरुजी, आनंदा सकपाळ, सचिन कदम, महेश शेलार, आर. टी. शिंदे, प्रकाश भातुशे, मोहन धनवे, मारुती पाटील, शंकर देसाई, कमल कदम, शारदा कुंभार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, पुणे जिल्ह्यातील तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.महिलांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर “आता उठवू सारे रान’ या क्रांतिगीताने अधिवेशनाची सुरुवात झाली. डॉ. पाटणकर म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या उरावर विकासाचा डोलारा उभा आहे. कष्टकरी जनतेच्या लढ्यातून महाराष्ट्रात पुनर्वसनाचा कायदा झाला.
या कायद्याने लाभक्षेत्रात जमीन मिळण्याचा अधिकार धरणग्रस्तांना मिळाला; पण 14 ऑक्टोबर 2021 चा शासन निर्णय प्रकल्पग्रसतांच्या मुळावर उठला आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा यासाठी आरपारची लढाई सुरू करत आहोत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शिवजयंतीपर्यंत बैठक घेऊन हा निर्णय मागे न घेतल्यास साधे शेतकरी मावळे या सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाहीत. श्रमिक मुक्ती दलाचा इतिहास लक्षात घेऊन सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. ऍड. शरद जांभळे यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले.
दोन ठिकाणी एकाच वेळी आंदोलन
सातारा आणि सांगली जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त कोयनानगर येथे ठिय्या आंदोलन करणार आहेत, तर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास बसणार आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून दहा हजार प्रकल्पग्रस्त आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली.