बहुरूपी दुर्गा भागवत यांचा 10 फेब्रुवारी हा जन्म दिवस. या निमित्ताने या विदुषीचे, रांधण प्रेमी स्त्रीचे, विद्याव्रतीचे आणि शब्द कलावंतीनीचे हे पुण्यस्मरण.
सन 1910 ते 2002 या 92 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी विपुल आणि कसदार लेखन केले. त्यांचे अनुवादित साहित्यही बरेच आहे. या शिवाय त्यांनी संस्कृत, पाली आणि इंग्लिशमध्येही साहित्य निर्मिती केली आहे. त्याचं सगळे आयुष्य ज्ञानकेंद्री होतं. आयुष्यभर त्यांनी अभ्यासच जणू व्रत घेतलं होत. त्यांचा जन्म इंदूरचा; पण पुढील सगळं आयुष्य मुंबईत गेलं. निर्भय, प्रामाणिकपणे मत मांडणाऱ्या, स्वतःचे विचार स्वातंत्र्य जपणाऱ्या लेखिका म्हणून जनमानसात त्यांनी आदराचे स्थान मिळविले.
त्यांनी बौद्ध साहित्याचे वाचन केले. मध्यप्रदेशातील हिंदू आणि आदिवासी जमातीतील परस्पर संबंध हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता. काही कारणाने त्यांची पीएच.डी. पूर्ण होऊ शकली नाही. यासाठी त्या तीन वर्षे आदिवासींमध्ये राहिल्या. त्यांच्या जीवनाचा सखोल आणि प्रत्यक्ष अनुभवांवर आधारलेला आदिवासींच्या भाषा, श्रद्धा, सण, समजुती इत्यादींची विविध अंगाने माहिती घेत त्यांनी प्रबंध तयार केला. याच दरम्यान एका विषारी सुरणाच्या विषबाधेने 27-28 वर्षांच्या दुर्गाबाईंना एका असाध्य आजाराशी सामना करावा लागला आणि त्यात त्यांच्या आयुष्याची सहा-सात वर्षे निष्फळ गेली. परंतु याच अनुभवातून, निसर्ग प्रेमातून ऋतुचक्र साकारले.
दुर्गाबाई आणि त्यांचे वडील नारायणराव यांचं नातं त्यांचं जीवन व्यापून टाकणारे होते. त्यांच्या जीवनात त्यांचे वडील आधारभूत होते, या आधार स्तंभाला टेकूनच दुर्गाबाईंनी दु:ख सोसली, वादळं पचवली आणि आनंदाच्या प्रसंगी मनाचा तोल सावरला. दुर्गाबाईंची आई लवकर गेली; पण वडिलांनी त्यांच्या दु:खाचं सावट मुलांवर कधीच पडू दिलं नाही.त्यांच्यावर प्रेम करण्यात त्यांनी सुख शोधलं. मुलींना घरात शिक्षणासाठी प्रोत्साहन होतं. मुलगा मुलगी हा भेद नव्हता.
विशेष म्हणजे मुलींना व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, निर्णयस्वातंत्र्य, वाद स्वातंत्र्य होतं. त्यांची आजी मथुरा सुधारकांच्या घरातील होती. ती पुस्तकवेडी होती. इंग्लिश पुस्तके वाचून ती मुलींशी चर्चा करीत असे. आर्थिक स्वातंत्र्याचे भानही आजीने मुलींमध्ये रुजवले. अशा पुरोगामी वातावरणात दुर्गाबाईंची जडणघडण झाली. परंतु स्व:ताचे स्त्रीपण त्यांनी कधी नाकारले नाही. मग ते भरतकाम, कशिदाकाम, विणकाम, स्वयंपाकातील रुची, साड्यांची आवड यात प्रतिबिंबित होत राहिले. त्यांच्यात सुप्त सौंदर्य दृष्टी होती.वाचन, लेखन, संशोधन यात मग्न असतानाही या छंदामध्ये त्या आनंदाचे क्षण शोधत असत. म्हणूनच या साऱ्या कौशाल्यातूनच त्यांचं बहुरंगी रसायन घडले.
प्राचीन भारतीय संस्कृती, लोकवाङ्मय, लोकजीवन, बौद्धधर्म, प्राणीजीवन, वनस्पतीजीवन हे त्यांचे कुतुहलाचे आणि अभ्यासाचे विषय. या विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण लिखाणाबरोबरच त्यांनी आठवले तसे, भावमुद्रा, पैस, डूब, रुपरंग, लहानी असे ललित लेखनही केले. महात्मा गांधीजींचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. तसेच लक्ष्मीबाई टिळक, बाळूताई खरे ही त्यांची स्फूर्तिस्थाने होती. त्यांचा परखडपणा, करारीपणा, तेजस्वीपणा यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. परंतु त्यांचं आतलं स्त्रीचं मन तितकच हळूवार होतं. त्यात मधुर असा सखीभाव होता. साधेपणा होता. निसर्गाशी त्यांचं सख्य होतं म्हणून सागरापेक्षा, नदीशी त्यांची अधिक जवळीक होती. नदी ही देखील त्यांची मोहक सखीच होती. स्त्री विषयीचा कमालीचा आपलेपणा त्यांच्या मनात होता. स्त्रीची प्रजनन शक्ती ही पवित्र आहे, असे त्या मानत म्हणूनच स्त्रीला त्या पूर्णा म्हणत.
दुर्गाबाईंचं व्यक्तित्व हे असे अनेकरंगी आहे. त्यांनी मराठी भाषेची श्रीमंती वाढवली. त्यांची वाङ्मयीन दृष्टी निर्भयतेशी जोडलेली होती.म्हणूनच कराडच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असताना त्यांच्या तेजस्वी वर्तनाने त्यांनी सर्वांना अचंबित केले. रसिका, पंडिता, तेजस्विनी, मन:स्विनी ही सारी विशेषणे त्यांना शोभून दिसतात. लेखनावर प्रेम करणाऱ्या दुर्गाबाई म्हणत की, त्यांच्या सारख्या अंतर्मुख व्यक्तींना स्वतःच्या भावनांना, चिंतनाला मुक्त अवसर द्यायला लेखन सारखा दुसरा मार्ग नाही. ज्ञानावर माझी नितांत श्रद्धा आहे.
म्हणूनच या ज्ञानी तपस्विनीने केलेल्या अत्यंत सशक्त लिखाणाला, त्यांच्या निर्भयतेला वंदनीय मानून शेवटी या भूमीकन्येचे वयाच्या 90 व्या वर्षीचे शब्द मनात घुमत राहतात…ज्या भूमीतून उगवले …हिरवी कोवळी बनले फळाफुलांनी लगडले ….वाढता वाढता महावृक्ष झाले नव्वद पावसाळ्यांचा त्याच भूमीवर मी आज पाहुडलेय विश्रब्ध भूमी कन्या बनून भूमीत विलीन होऊन ……मृण्मयी बनण्याचा दिवस हा उभा आहे हाकेच्या अंतरावर….माझी तयारी झाली आहे ना निरोपाचे शब्द……ना उसासे ना अश्रू जगाशी बोलता बोलता..मी येऊन पोचले आहे माझ्यापाशी मला हाकही मारावी लागणार नाही… तो उगवेल तेव्हा मी नि …घा ..ले …..ली …. असेन अशा दुर्गेचं हे पुण्यस्मरण.
– आरती मोने