भारतीय क्रिकेट संघ एकीकडे आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणार असे बोलले जात होते. मात्र, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांचे अनाकलनिय निर्णय संपूर्ण संघाला भोवले व भारताचा स्वप्नभंग झाला. ही जोडी एकत्र आली त्यावेळी अनेकांनी भारतीय संघाच्या जागतिक क्रिकेटवरील यशाची नांदी ठरेल असे वक्तव्य केले होते. मात्र, प्रत्यक्षात ही जोडी साफ अपयशी ठरत आहे.
विराट कोहली कर्णधार असताना रवी शास्त्री हे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलस्थान मिळवले. तसेच विविध मालिकांमध्येही त्यांच्या जोडीने संघाला नवनवे यश मिळवून दिले. मात्र, केवळ आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा संघाला जिंकता आल्या नाहीत याचे भांडवल केले गेले व टीकाही केली गेली. शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यावर हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांना पाचारण केले गेले. त्यावेळी द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी बीसीसीआयची विनंती अनेकदा फेटाळली होती.
अखेर सौरव गांगुली हा द्रविड यांचा घनिष्ठ मित्र अध्यक्ष बनला व त्यांनी द्रविड यांचे मन वळवले. अखेर द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली. मग त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट रोहित शर्माच होता. कारण विराट कोहली जर कर्णधार असता तर तेच घडले असते जे कोहली व अनिल कुंबळे जोडीबाबत घडले. गांगुलीला हा संघर्ष परवडणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी कोहलीला अस्वस्थ केले. कोहलीही सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्यानेच स्वतःहून वर्कलोडचा मुद्दा उचलून धरला व सातत्याने काही मालिकांमधून विश्रांती घेतली. हे बीसीसीआयच्या पथ्यावरच पडले.
कोहलीने कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला व पाठोपाठ त्याच्याकडून एकदिवसीय तसेच टी-20 संघाचे नेतृत्वही काढून घेतले गेले. कोहलीशी याबाबत साधी चर्चा करण्याचे सौजन्यही दाखवले गेले नाही. शास्त्रींची मुदत संपलेली होती व द्रविड यांनी टेकओव्हर केले होते. तर दुसरीकडे कोहलीकडून नेतृत्व गेल्याने संघात रोहित शर्मा हाच सर्वोत्तम व वरिष्ठ पर्याय होता. त्यामुळे त्याच्याकडेच नेतृत्व सोपवले गेले व नवी युती उदयाला आली. जेव्हापासून ही युती भारतीय क्रिकेटमध्ये कार्यरत झाली तेव्हा त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली गेली. आता भारतीय संघाचा सुवर्णकाळ सुरू होणार, जागतिक क्रिकेटवर एकछत्री अंमलही सुरू होणार अशा वल्गनाही केल्या गेल्या. मात्र, मायदेशात शेर व परदेशात ढेर हे चित्र काही बदललेले दिसत नाही.
झिम्बाब्वेत आपण जिंकलो पण त्यावेळी द्रविड नव्हे तर सध्याच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे नवे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण संघाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून गेले होते. द्रविड हे आशिया करंडक स्पर्धेसाठी संघासह अमिरातीला जाणार होते मात्र, त्यांना करोनाची बाधा झाली व त्यांचे जाणे बारगळणार अशी स्थिती होती. ते यातून बाहेर आले व काही सामने मुकल्यावरही ते दुबईला रवाना झाले व संघासह त्यांनी व्यूहरचना तयार करायला सुरुवात केली. अर्थात त्यांनी बांधलेले सर्व आराखडे अपयशी ठरले यात शंका नाही. कारण ज्या संघाला संभाव्य विजेता मानले जात होते तो संघ या स्पर्धेची अंतिम फेरीही गाठू शकला नाही. मग ही युती अपयशी ठरत नाही का?
रत्नपारख्याकडून निराशा
द्रविड एक क्रिकेटपटू म्हणून महान आहेत याबद्दल दुमत असायचे कारण नाही. पण ते रत्नपारखी आहेत व त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून देशाला सेकंड बेंच दिला असे जे बोलले गेले ते आशिया स्पर्धेत कुठेच दिसून आले नाही. उलट त्यांनी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा नवोदितांनाच डावलल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजू सॅमसन, शुभमन गिल, इशान किशन, उमरान मलिक असे कितीतरी नवोदित खेळाडू तयार झाले व नवी गुणवत्ता समोर आली असे सांगितले जाते. मात्र, द्रविड यांनी जर हे शिष्य तयार केले होते तर मग त्यांना सातत्याने खेळवले का जात नाही. गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष तर द्रविड यांच्यापेक्षा कितीतरी कमी सामने खेळलेले निवड समितीचे सदस्य असे चित्र असताना त्यांच्या पसंतीचा संघ खेळवणे त्यांना का जमत नाही.
आशिया करंडक स्पर्धेत ते जो अंतिम संघ खेळवत होते ते पाहता त्यांचाही नवोदितांवर विश्वास नाही का, असा प्रश्न मनात निर्माण झाला होता. एक वेळ असे बोलले जात होते की द्रविड यांनी पुढील पाच वर्षांचा विचार करत संघ तयार करण्याची योजना आखली आहे व सातत्याने नवोदितांना संधी देत आगामी काळातील भारतीय संघाचे भविष्य घडवण्याची ही प्रक्रिया असल्याचेही सांगितले गेले. प्रत्यक्षात तसे काहीही घडताना दिसलेले नाही. आशिया करंडक स्पर्धेत त्यांनी दुखापतीतून पूर्ण बरा झालेल्या अष्टपैलू दीपक चहरला राखीव म्हणून का ठेवले, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान का दिले नाही. तसेच स्पर्धेतील आव्हान संपलेले असताना त्यांनी चहरला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळवले मग तो संघात आहे हेच ते विसरले होते का?
या स्पर्धेच्या साखळीत भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्ताचा पराभव करत थाटात प्रारंभ केला होता. तसेच हॉंगकॉंगचा पराभव करत थाटात सुपर फोर गटातही प्रवेश केला होता. मात्र, या गटात भारताला पहिल्या लढतीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला तर दुसऱ्या लढतीत श्रीलंकेने आपला पराभव केला. या दोन्ही सामन्यांत भारताची कामगिरी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या चारही आघाड्यांवर अत्यंत सुमार झाली. तसेच संघ निवडही साफ चुकले. रोहितने गोलंदाजीत केलेले बदल, तसेच फलंदाजीत बदललेले क्रम यशस्वी ठरले नाहीत. मग प्रश्न असा निर्माण होतो की, या मागे काही विचार किंवा योजना होती की फॉर्मली निर्णय घेतले गेले होते. मुळातच द्रविड व रोहित यांची युती अनैसर्गिक असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यांचे स्वभाव, देहबोली एकसारखे नसल्याने येणाऱ्या काळात कोहली व कुबंळे प्रमाणे त्यांच्यातही दुरावा येणार हेच दिसत आहे.
पंतचे लाड कशासाठी?
ऋषभ पंत जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये अवतरला तेव्हा त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे वगैरे बोलले गेले मात्र, त्यावेळी हे सांगितले गेले नाही की तो बेजबाबदारही आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने भारताच्या यशात मोलाचा वाटा उचलला होता हे मान्य, पण त्याचा अर्थ असा नाही की तो कितीही बेजबाबदारपणे खेळला तरीही त्याचे संघातील स्थान कायम राहील. पण तरीही तो आज संघात आहे हे अपयश कोणाचे? द्रविड-रोहित युतीचे, बीसीसीआयचे की निवड समितीचे. ज्या संघात दिनेश कार्तिकसारखा फिनिशर तसेच सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे तोच संघ पंतसाठी आग्रही असतो. खुद्द द्रविड यांनीच एक मत व्यक्त केले होते की, अंतिम संघ निवडीसाठी पंत पहिली पसंती नाही. मग तरीही पंत सातत्याने अपयशी होत असतानाही त्याचे संघातील स्थान पहिल्या पसंतीचेच कसे ठरते.
कार्तिकने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अत्यंत स्वप्नवत कामगिरी केली आहे. तसेच त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीप्रमाणे बेस्ट फिनिशरची भूमिकाही उत्तमरीत्या वठवली होती. त्याच जोरावर त्याला भारतीय संघात पुनरागमन करता आले होते. मग आशिया स्पर्धेत त्याला अवघ्या एकाच साखळी सामन्यात खेळवले गेले. तर स्पर्धेतील आव्हान संपल्यावर त्याला सुपर फोर गटातील अखेरच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळवले गेले. अर्थ आणि स्वार्थ संपल्यावर नवोदितांनी संधी देण्याची द्रविडची ही रीत कोणाला पटेल का? आता काही मंडळी म्हणतील की, यामागे त्याची काहीतरी योजना असेल म्हणून, पण जर योजना मनातल्या मनात तयार केल्या तर गैरसमज वाढणारच ना. पंत हा कोण आहे तर एक सामान्य खेळाडू मग त्याचे इतके लाड कशासाठी व का केले जात आहेत, याचे उत्तर ही मंडळी देतील का?
ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध योजना हवी
आशिया करंडक स्पर्धा संपली व भारतीय संघ मायदेशी परतून ऑस्ट्रेलियासोबत मालिका खेळत आहे. मात्र पहिल्याच सामनात ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. अशा स्थितीत द्रविड व रोहित यांनी नवी योजना तयार करायला हवी. संघातील पुढील पाच वर्षांचे भविष्य कोणते खेळाडू असतील त्याचा विचार करून या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही मालिकांसाठी अंतिम संघ निवड होणे गरजेचे आहे. तसेच वशिल्याच्या व मर्जीतल्यांना कठोर निर्णय घेत संघातून बाहेर काढले पाहिजे व जास्तीत जास्त नवोदितांना सातत्याने खेळवले गेले पाहिजे. या दोन मालिका म्हणजे काही जीवन मरणाचा प्रश्न नाहीत की हरल्यावर शिक्षा होईल उलट या मालिकांमधून अनुभव घेत ऑस्ट्रेलियात आगामी काळात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडकासाठी संघातील प्रत्येक खेळाडूसाठी दुसरा पर्याय तयार असावा.
2007 साली धोनीच्या नेतृत्वात आपल्या संघाने टी-20 विश्वकरंडक जिंकला होता. आता त्याला तब्बल 15 वर्षे होऊन गेली आहेत. आता यंदा ऑस्ट्रेलियात विश्वविजयाची स्वप्नपूर्ती व्हावी असे वाटत असेल, तर द्रविड-रोहित युतीने सर्वसमावेशक धोरण आखून नवोदित खेळाडूंनाच ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळवण्यावर भर दिला पाहिजे तरच त्यांना बलाढ्य संघाविरुद्ध कसे खेळायचे व दडपण कसे हाताळायचे याचे धडे मिळतील व तावून सुखावून आलेला भारतीय संघ विश्वकरंडकाच्या मोहिमेला प्रारंभ करेल. या दोन्ही मालिकांत तसेच टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो यावर द्रविड व रोहित युती टीकेल का तुटेल हे समोर येईल.
अमित डोंगरे