विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत यंदा एक चमत्कार घडला. महाराष्ट्राचा सलामीवीर फलंदाज ऋतूराज गायकवाडने 10 सामन्यांत तब्बल सात शतके फटकावली. त्यात एक द्विशतकी खेळीही होती. इतके सातत्य दाखवल्यावरही त्याचा भारतीय संघात समावेश करा, असेही कोणी म्हणताना दिसले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विक्रमांचे इमले बांधणारे अनेक फलंदाज आहेत की जे आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्लॉप ठरले. ऋतूराजच्या बाबतही हेच घडत आहे यामुळेच त्याला शापित म्हणावे की कमनशिबी हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ण्यातील क्रिकेट क्षेत्रात ज्या खेळाडूंनी आपली एक ओळख किंवा आपले एक स्थान निर्माण केले त्यात ऋतूराजचे नाव निश्चितच प्राधान्याने घ्यावे लागेल यात शंका नाही. पण मग तो देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याइतका चांगला आहे हे निवड समिती का मान्य करत नाही. अर्थात त्याची आजवरची कामगिरी पाहिली तर त्याने आयपीएल स्पर्धेत आपली गुणवत्ता सातत्याने सिद्ध केल्याचे दिसते. मात्र, जेव्हा त्यापेक्षा मोठ्या स्तरावर संधी मिळते तिथे तो फारसा यशस्वी ठरल्याचे दिसत नाही.
पूर्वी अजय शर्मा या दिल्लीच्या खेळाडूला रणजी करंडक स्पर्धेचा दादा समजले जायचे; पण प्रचंड ओरड झाल्यावर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघातही स्थान दिले गेले. पण काय झाले हे सगळ्यांनीच पाहिले असेल. साफ अपयशी ठरल्यावर त्याचे संघातील स्थानही गेले इतकेच काय त्याचा आत्मविश्वासही इतका खालावला की त्याला त्यानंतर रणजी स्पर्धेतही चमकदार कामगिरी करता आली नाही. हेच ऋतूराजच नव्हे तर अनेक खेळाडूंच्या बाबतीत घडलेले आपण पाहिले आहे. यामागे कारण काय याचा जर शोध घेतला तर असे कळून येते की बिगमॅच फेल्युअर मेंटॅलिटी या खेळाडूंच्या बाबतीत खरी ठरताना दिसते.
केवळ ऋतूराजच नव्हे तर मुंबईचा पृथ्वी शॉ, अरमान जाफर, सर्फराज खान, संजू सॅमसन यांसारखे खेळाडू आयपीएल किंवा देशांतर्गत स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा करतात; पण मोठ्या स्तरावर अपयशी ठरतात. मग अशा खेळाडूंना शापित म्हणावे की कमनशिबी असा प्रश्न पडतो. यंदाच्या हजारे करंडक स्पर्धेत ऋतूराजने सातत्याने शतकी धावा केल्या. मात्र, अखेरच्या सामन्यातही शतक फटकावल्यानंतरही महाराष्ट्राचा संघ स्पर्धा जिंकू शकला नाही. त्यामुळे त्याच्याकडे निवड समितीचे लक्ष जाणार का, हादेखील एक मोठा प्रश्न आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मर्जीतील असल्याने त्याला चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल स्पर्धेत खेळता येते. मात्र, तो यातच समाधानी असल्याचे सातत्याने का वाटते.
यंदाच्या वर्षी त्याला ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांत पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यापूर्वी 2021 साली त्याने श्रीलंकेविरुद्ध टी-20 पदार्पण केले. मग या मिळालेल्या संधीचे सोने करण्याऐवजी त्याला अपयशाचा धनी का व्हावे लागले. मोठ्या स्तरावर खेळण्याची मानसिकता नाही का, अन्य काही कारण आहे हे समजेनासे झाले आहे. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये तो सातत्याने यश मिळवताना दिसतो मग आंतरराष्ट्रीय स्तरावर कधी यश मिळवणार असाही मुद्दा येतो. अर्थात, निवड समितीने त्याला संधीच दिली नाही तर यश कसे मिळणार हे जरी खरे असले तरीही त्याने त्यासाठी किती प्रयत्न केले, कितीवेळा लक्ष वेधून घेतले.
यंदाच्या हजारे स्पर्धेचा अपवाद सोडला तर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये याचे दाखले किती दिले हा देखील मोठा प्रश्न आहे. आयपीएल व देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळण्यातच तो धन्यता मानतो का, असेही वाटून जाते. इतक्या चांगल्या खेळाडूची गुणवत्ता देशाच्या संघासाठी उपयोगी पडत नाही याची खंत आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी जे सचिन तेंडुलकरला जमले ते सगळ्यांनाच जमणार नाही; पण निदान प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे.
आता येत्या मौसमात तरी ऋतूराजने आपल्या कारकिर्दीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. जे यश तो देशांतर्गत किंवा आयपीएल स्पर्धेत मिळवताना दिसत आहे ते त्याने संधी मिळाली की त्याचे सोने करत आंतरराष्ट्रीय स्तरावरही मिळवावे अशीच अपेक्षा आहे. अन्यथा त्याच्या नावासमोर शापित किंवा कमनशिबी हीच गोष्ट चिकटलेली दिसेल.