आपण काय काय समजत होतो ना त्याच्याबद्दल? पण तो तसा नाहीये. म्हणजे नाहीच. नाही म्हणजे सुरवातीपासूनच नव्हता. आपणच काहीही विचार करत राहिलो.
लग्नाच्या आधीही तो तसाच होता. निगर्वी, शांत, समजूतदार. लग्नाच्या वीस वर्षांनंतरही तसाच आहे. या वीस वर्षांत दोन-तीन मानाच्या पदव्या मिळवल्या, एवढी मोठ्ठी नोकरी मिळवली पण तरीही त्याला कधी गर्व, अहंकार शिवला नाही. “ही इज माय गाय, ही इज माय बेस्ट फ्रेंड, ही इज माय लव…’ हे सगळं तिच्या मनात ती स्वत:शीच बोलत होती. शेवटचं वाक्य मनातल्या मनात जरी उच्चारलं असलं तरीही तिच्या अंगावर त्याचा शहारा उमटलाच…
किती वेडे होतो आपण… घरच्यांची त्याची भेट करून द्यायच्या आधीच घरी कुणी नसताना गुपचूप त्याला रिक्षात घालून घरी आणलं होतं आपण. कुठं कुठं भेटायला बोलवायचो आपणच त्याला. तो ही यायचा गपगुमान… आज्ञाधारक प्रियकरासारखा… तो बोलायचा फार कमीच पण एकांतात किंवा अंधारात किंवा बंद दाराआड त्याची बोटं चालायला लागली की… बाप रे… जादू, मिरॅकल, जस्ट बियॉंड इमॅजिनेशन…
त्याने एकदा सांगितलं होतं. एका कादंबरीत एका पुरूषाला त्याची प्रेयसी “सेक्स गॉड’ असं म्हणते… तसाच तो असायचा त्यावेळी. मदन, कामदेव, सेक्स गॉड…
लग्नानंतर तो मला काश्मीरला घेऊन गेला. एवढ्या दूर कधीच गेले नव्हते. किती मनापासून तो सगळं सांगत होता. दाखवत होता. त्याच्या हातात हात घालून तिथे फिरतानाचा क्षण अजून आठवतोय. तिथून परतल्यावर कित्येक महिने मी त्याला विचारत होते, “आपण इतक्या लांब गेलो होतो?’ मग तो नकाशावर मला दाखवायचा… इथून आपण निघालो मग पुढे राजस्थान, मग हरियाणा, मग दिल्ली, मग पंजाब आणि पुढे जम्मू… अशी आपली ट्रेन गेली होती. तो सगळा प्रवास अविस्मरणीय होता. अविस्मरणीय बनला तो त्याच्या साथीमुळेच.
आत्ता परवाच माझ्यासाठी लॅपटॉप घेतला. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपल्यासाठी स्वतंत्र लॅपटॉप असेल. पण तो मिळाला. त्याच्यामुळे. दुसऱ्या दिवशी मी त्याला मेसेज केला. “थॅंक यू फॉर लॅपटॉप…’
तर त्याचा रिप्लाय काय…
“मेरा मुझमे कुछ नही, जो कुछ है सब तेरा ।
तेरा तुझको सौप दिया, बस दरसन है मेरा ।।
तो घरी आल्यावर मी विचारलं, हे काय…’
तर त्याचं सुरू झालं. या पृथ्वीवरच्या अस्तित्त्वात आपल्या येण्याचं प्रयोजन ठरलेलं असतं. आपण काय करायचं ते ही ठरलेलं असतं आणि त्यापुढे जाऊन आपला जोडीदार, आसपासची माणसं, मित्र-मैत्रिणी, आई-वडील हे सगळं पूर्वनियोजित असतं. लॅपटॉपचंही तसंच पूर्वनियोजितच होतं. फक्त वेळ यायची होती एवढंच. वेळ आली आणि तुझ्या हातात तो आला. यात मी देणारा नाही किंवा तू घेणारी नाहीस. पुढं जाऊन सांगायचं तर तो दुकानदार, ती कंपनी, अगदी त्या कंपनीचे मालक इथपर्यंत सगळी लोकं हे केवळ निमित्तमात्र… फक्त या महाकाय व्यवस्थेचा एक भाग.
पक्का पॉलिटिशियन… तिनं आपला नेहमीचा आवडता शेरा देऊन टाकला.
अं हं. पक्का पॉलिटिशियन असं तुला वाटतं. माझं तसं असणंही या सगळ्या महाकाय व्यवस्थेचा एक भागच आहे. आता माझं जे रूप, जे आकलन किंवा जे चित्र तुझ्या डोळ्यात आहे ते कदाचित माझ्या एखाद्या मित्राच्या डोळ्यात नसेल. त्याच्या लेखी मी एक कवी असेन, नाहीतर चित्रकार असेन नाहीतर आणखी काहीतरी असेन. जग तुम्हाला सगळं एका नजरेत दिसतंच नाही. दिसतं तो एक तुकडा असतो. त्या तुकड्यावरून तुम्ही जगाचं आकलन करत असता. तुटपुंजं आकलन.
मग आपण काय आहोत… तिचा प्रश्न.
या महाकाय जगाच्या पसाऱ्यातला केवळ एक ठिपका किंवा त्याहूनही लहान कणमय अस्तित्व. त्या अस्तित्वासाठी जे ठरलेलं आहे, जे योजित आहे ते त्या त्या अस्तित्वाला मिळत जातं. देणारा, घेणारा, आणणारा, नेणारा वगैरे असं कुणी नुसतंच मुळी…
ती खिडकीतून बाहेर बघत राहिली. बाहेर संध्याकाळ दाटून येत होती आणि चिमण्यांचा महाकाय चिवचिवाट सुरू होता…
काश्मिरात पहलगामच्या वर चंदनवाडी. पहलगामपासून वळणावळणाचा रस्ता वर चंदनवाडीपर्यंत जातो. या वळणांना हेअरपिन टर्न्स म्हणतात. बायका केसाला ज्या पिना लावतात त्याला बुडाला जसं यू आकाराचं वळण असतं तशी ही अगदी शार्प वळणं असतात म्हणून त्यांना हे नाव पडलं. सकाळचे सहा वाजले आहेत. पहलगामच्या क्षितिजावर प्रसन्न सकाळ उगवली आहे. सूर्यकिरणांच्या चुंबनाने झाडांच्या पानांवरचं दव पाघळत आहे आणि त्या स्पर्शाची स्वर्णिम लालिमा लेऊन देवदाराची पानं जास्तच टवटवीत दिसू लागली आहेत. पहलगामच्या यात्री तळावरून मिनी बसेस, ट्रॅक्स, जीप ही वाहनं अमरनाथच्या यात्रेकरूंना घेऊन चंदनवाडीकडं निघाली आहेत. काही साधू पायीच निघाले आहेत. तर काहींच्या चिलमींची मैफल अजून सुरू आहे.
पहलगामच्या एका कोपऱ्यातल्या एका आश्रमात नित्यनेमाची पूजा झाल्यावर महंतांनी आरती अंगणात नेली, तुळशीवरून ओवाळली. चारी दिशांना ओवाळली. वर बघून सूर्यदेवाला पाण्याचं अर्घ्य वाहिलं त्यालाही आरती दाखवली आणि शिष्याला हाक मारली. शिष्याने आरतीवरून दोन्ही हातांचे तळवे फिरवले, डोळ्यांना लावले, मस्तकावरून छातीवरून तसेच ते तळवे कमरेपर्यंत खाली नेले, महंतांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि त्यांच्या हातातली आरतीदाणी घेतली. संपूर्ण आश्रमात ती आरती फिरवून आणून त्याने पुन्हा देव्हाऱ्याशेजारी ठेवली. सर्व देवांना नमस्कार केला. आश्रमाच्या आद्यगुरूंना नमस्कार केला आणि पुन्हा महंतांकडे आला.
महंतांनी सवयीने त्याला सांगितलं… पाच लोगों का खाना बनेगा..
शिष्य – लेकिन हम तो दोनों ही आश्रम में है
महंत – और तीन लोग है, उसमे से एक को तुम पहचानते हो, दो को तो मै भी नहीं पहचानता.
शिष्य ठीक है गुरूजी म्हणून डोकं खाजवत निघून गेला. महंतजींचं बोलणं असंच कोड्यात टाकणारं असतं हे त्याला माहीत होतं. पण थोड्या वेळाने त्यांच्या बोलण्याचा उलगडाही होतो, याचीही त्याला जाणीव होती. त्यामुळे तो विचार मागे टाकून तो मुदपाकखान्यात शिरला. तिथे मोठ्ठा लाल भोपळा होता. आज याचीच भाजी करावी असं त्याला वाटलं. त्याने तो भोपळा कापला. आतून छान अर्धकच्चा होता. त्यामुळे त्याला वाटलं याची थोडी भजीही करावीत.
त्याने लाल भोपळा छान चिरला. भज्यांसाठी थोडे बारीक तुकडेही केले. सगळे स्वच्छ धुऊन घेतले. एका पातेल्यात त्याने कडिपत्ता, वेलची, जिरे-मोहरी, हळद, आलं, लसूण याची छान फोडणी दिली आणि त्यात पातळ भाजीसाठी भोपळ्याच्य मोठ्या फोडी टाकल्या. गॅस मोठा करून तो बाजूला आला. दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई ठेवली. त्यात थोडं तेल ओतलं आणि भोपळ्याच्या छोट्या फोडींची भजी करण्यासाठी त्याने बेसनपीठ कालवलं. त्यात ते छोटे तुकडे टाकून त्याने खमंग भजी बनवली.
आता जेवण तयार झालं होतं. दोन वाजताची जेवणाची वेळ होती. अजून दहा मिनिटं होती. म्हणून त्याने पाच ताटं काढली. ती स्वच्छ करू लागला. तशी घंटी वाजली. आश्रमात कुणीही आलं तर त्याची सूचना मिळण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर एक घंटी बांधलेली होती. ती घंटी वाजवून पाहुण्याने आपण आल्याची सूचना द्यावी असे अपेक्षित होते. घंटी वाजली तसं कुणीतरी आलं म्हणून शिष्य दाराशी गेला. एक साठीचे गृहस्थ होते. त्यांच्या सोबत पन्नाशीची स्त्री होती. कपाळावर मोठं कुंकू ल्यालेली. बहुधा नवराबायको असावीत.
महाराष्ट्रातून आलोय, महंतांना भेटायला. – ते गृहस्थ म्हणाले.
शिष्याने हात जोडून वाकून नमस्कार केला. त्यांना आत घेतलं. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला नळ होता. त्या नळाखाली दोघांनी हातपाय धुतले. शिष्य त्यांना महंतांच्या खोलीत घेऊन गेला. थोड्या वेळाने शिष्याने पाच ताटं करून नेली. महंत आणि दोन्ही पाहुणे भोजनकक्षात बसले होते. पाचही ताटं शिष्याने महंतांसमोर ठेवली. महंतांनी एक ताट उचललं आणि त्या गृहस्थाच्या हातात देत म्हणाले, लो पा लो.
असंच त्यांनी दुसरं ताट त्या स्त्रीच्या हाती दिलं. दोघांनी ते ताट समोरच्या पाटावर ठेवलं. शिष्याने एक ताट महंतांच्या समोर पाटावर ठेवलं. महंतांनी पुन्हा एकदा लो प्रशाद पा लो, असं सांगून त्या दोघांना जेवायची आज्ञा केली. एक ताट शिष्याच्या हाती देत अपने एकनाथ महाराज को दे आना… म्हणाले.
एकनाथ म्हणजे त्यांच्या आश्रमाच्या दाराशी रोज येणारा कुत्रा होता. शिष्याने त्याला ताट दिलं. परत भोजन कक्षात आला. महंत एक ताट त्याच्या हाती देत म्हणाले, लो प्रशाद पा लो. जिसका है वो उसे पा लेता है, देनेवाला या लेनेवाला कोई होता ही नहीं है… याची जाणीव त्या क्षणी शिष्याला झाली.
– बी. चंद्रदास