कामशेत – मावळ तालुक्यात आता भातकापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भातशेतीतून उरले सुरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे, यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. तसेच या कामासाठी मजूर मिळावेत, यासाठही शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
शेतीच्या विविध कामांसाठी मजूर मिळत नाहीत. जे मजूर कामासाठी येण्यास तयार आहेत ते देखील अव्वाच्या सव्वा मजुरी मागतात. त्यामुळे शेतीच्या कामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला लागले आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुणही काम करताना दिसून येत आहेत. या कामादरम्यान ही मंडळी अनेक गमतीजमती, गाणी, जेवण आदीची मजाही घेत आहेत.
नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून खास करून शेतीच्या कामाला गावी आले आहेत. सुशिक्षित तरुणांनाही शेतीत रस निर्माण होणे, हा कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल आहे. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसू नये, यासाठी शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून कापणीचे काम आटपून घेत आहेत.
वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या वापराने कामे जलदगतीने आटोपून घेत आहेत. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामुग्रीचा वापर करत आहेत. यामध्ये श्रम, वेळेची बचत होत असली तरी यांत्रिक शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागत आहे. मळणी करण्यासाठी भल्या पहाटे शेतात शेतकरी आणि यंत्र दाखल होत आहेत.
ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होत आहेत. खळ्यांमध्ये पडलेला भात पोत्यात भरून घरात आणून टाकण्याचे काम सुरू आहे. शेतीची सर्व कामे करतो. कापणीच्यावेळी काही शेतात पाणी साठलेले आहे, तर अनेक शेत खाडी, नदी व तळ्याच्या शेजारी आहेत. येथील ताजी मासळी पकडून मस्त कालवण बनवून अनेक जण ताव मारत आहे. याच दरम्यान सुख-दुखाची देवाण घेवाण सुरू असते. तसेच, काही जण लोकगीते सुद्धा म्हणत आहेत. शेतीचे काम करताना एकूणच सर्व धम्माल आणि मज्जा येते.
– सोमनाथ चोपडे, तरुण शेतकरी