मुंबई – कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांना पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले होते. याविरोधात निलंबित खासदारांनी अन्नत्याग केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
I will also take part in their (eight suspended Rajya Sabha MPs) movement. I will fast for a day to show support: Sharad Pawar, NCP (File Photo) pic.twitter.com/bawRVcxwxJ
— ANI (@ANI) September 22, 2020
शरद पवार म्हणाले कि, राज्यसभेत कृषी विषयक विधेयक येणार होती. या विधेयकांवर दोन-तीन दिवस चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र, ही विधेयके तातडीने मंजूर करावी, अशी सत्ताधारी पक्षाची भूमिका होती. या विधेयकांबाबत सदस्यांना प्रश्न होते, चर्चा करण्याचा आग्रह होता. परंतु हा आग्रह बाजूला ठेवून सभागृहाचे काम पुढे रेटून नेण्याचे दिसत होते. हे नियमाविरुद्ध असल्याचे खासदार सतत सभापतींना सांगत होते. प्रतिसाद न मिळाल्याने सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली. मात्र उपासभातींनीही ऐकायला हवे होते. पण तसे न करता आवाजी पद्धतीने मतदान घेतले व विधेयके मंजूर झाली. त्यामुळे सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती.
उपासभापतींनी सदस्यांना मत मांडायची संधी द्यायला हवी होती. मी महाराष्ट्रात आणि संसदेत काम केले आहे. पण पीठासीन अधिकाऱ्यांकडून असे वर्तन पाहिले नव्हते, असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.
तसेच, इतक्या घाईत दोन्ही विधेयके एकत्र संमत करण्याची गरज नव्हती. केंद्राच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली आहे.