आपल्या संस्कृतीत विद्येची देवता म्हणून श्रीशारदेची उपासना केली जाते. नवरात्रात दुष्टांचे निर्दालन करणाऱ्या दुर्गेचे आपण जसे पूजन करतो, तसेच शालीन वीणावादिनी सरस्वतीचेही आदरपूर्वक पूजन करतो. श्रीशारदा ही तर विद्येची देवता.
योग्यांना ध्यान करण्याची, साधकांना अनुसंधानात (परमेश्वराशी जोडलेले) राहण्याची आणि सिद्धांना समाधीत स्थिर टिकून राहण्याची शक्ती तिच्यापासून मिळते. जगातील सर्व सौंदर्याचे मूळ असणारी ही शारदा परमार्थात साधकाला मदत करते. गणपती ज्ञानरूप आहे तर शारदा सामर्थ्यरूप आहे, असे संत रामदास म्हणतात. स्त्रीरूपी शारदादेवीच्या सामर्थ्याचे ते परोपरीने वर्णन करतात. तिला ते वेदांची आई, ब्रह्मदेवाची कन्या, वाणीची स्वामिनी आणि महामाया असे संबोधतात.
मनोव्यापार, मानसशास्त्र या संकल्पना आत्ताआत्ता पाश्चात्य लोकांना कळू लागल्या. हिंदू संस्कृतीत यावर फार पूर्वीच संशोधन झाले आहे. वेदग्रंथांत वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपल्या मनात आपल्याही नकळत काही भावना येत असतात. त्याला परा म्हणतात. शरीराचा मध्यभाग म्हणजे पोटात जेव्हा या भावना किंवा विचार येतात, तेव्हा त्याची आपल्याला जाणीव होते. त्याला पश्यंती म्हणतात. मग तो विचार हृदयाच्या भागात येतो. आपल्या मनात तो नीटपणे तयार होतो. हा वाणीचा मध्यमा प्रकार झाला आणि मग तो विचार आपल्या मुखातून शब्दरूपाने बाहेर पडतो यास वैखरी म्हणतात. हे सारे शारदादेवी घडवून आणते. म्हणून रामदास म्हणतात,
जे उठती शब्दांकुर । वदे वैखरी अपार ।
जे शब्दांचे अभ्यांतर । उकलून दावी।।
शारदेमुळे शब्दांचे अंकुर उगवतात. म्हणजे सूक्ष्म रूपाने शब्द उत्पन्न होतात. वैखरी वाणीचा उपयोग करून अपार शब्द बोलले जातात. मात्र शारदादेवी नुसती बोलण्यास उद्युक्त करीत नाही; तर तीच शब्दांचे अंतरंगही… त्याचा भावार्थही उलगडून दाखवते. समर्थ रामदास शारदेची शक्ती किती तऱ्हांनी वर्णन करतात पहा ः
जे सर्व नाटकअंतर्कळा । जाणीव स्फूर्ति निर्मळा।।
जयेचेनि स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ति ।।
जग म्हणजे विशाल रंगभूमी आहे. या विश्वरूपी नाटकात जे दृश्य घटक आहेत, त्यांच्या अंतर्यामी राहून शारदा त्यांना आपल्या शक्तीने नाचविते. एका अर्थाने विश्वातल्या सर्व घडामोडी देवी शारदाच घडवून आणते. शिवाय जाणिवेत उत्पन्न होणारी अत्यंत निर्मळ स्फूर्ती तीच आहे. ज्ञानामधे वास करणारे सामर्थ्यही तिचेच रूप असून तिच्या कृपेने परमानंदाचा विलास भोगता येतो. त्यासाठी स्वानंदसोहळा असा सुंदर शब्द त्यांनी वापरला आहे. स्वतःस होणाऱ्या आनंदाचा अनुपम सोहळा तिच्या कृपेने अनुभवता येतो.
“लावण्यस्वरूपाची शोभा । जे परब्रह्मसूर्याची प्रभा।।‘ या शब्दात रामदास स्वामींनी शारदेचे कौतुक केले आहे. ते तिला “कळीकाळाची नियंती। सद्गुरुकृपा।।’ म्हणतात. देवी शारदा ही काळावर स्वामित्व गाजविणारी सद्गुरूकृपा आहे.
आपण काही वेळा पंचप्राण हा शब्द वापरतो. हे पाच प्राण म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. पाच ज्ञानेंद्रियेही आपल्याला माहीत आहेत. कान, नाक, त्वचा, जीभ आणि डोळे. या पाच इंद्रियांच्या द्वारे आपल्याला ज्ञान होते म्हणून ही ज्ञानेंद्रिये. कर्म करणारी पाच इंद्रिये म्हणजे हात, पाय, वाचा, गुद आणि जननेंद्रिय.
आपल्या पूर्वजांनी मनुष्याची किती व्यवस्थित विभागणी केली आहे पहा. इतक्यावरच ते थांबले नाहीत. मन ही आणखी एक कला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत मन नावाचे काही दिसत नाही आणि म्हणून ते अस्तित्वात नसते असे पाश्चात्यांचे म्हणणे होते. आता मात्र त्यांनी मनाचे अस्तित्व मान्य केले आहे. अशा या एकदंतरीत सोळा कला माणसाच्या जीवनात असतात. या संदर्भात संत रामदास म्हणतात,
“जे मोक्षाश्रिया माहांमंगळा। जे सत्रावी जीवनकळा।
जे सत्वलीळा सुसीतळा। लावण्यखाणी।।’
शारदा म्हणजे मोक्षाचे वैभव व मंगलात मंगल अशी अमृतरूपी सतरावी जीवनकलाच होय. लावण्याची खाण असलेली शारदा जीवनाला शांती देणारी सत्वगुणांची लीला आहे.
शारदा देवीचे कर्तृत्व वर्णन करताना ते म्हणतात ः
“जे परमार्थमार्गीचा विचार । निवडून दावी सारासार ।
भवसिंधूचा पैलपार । पाववी शब्दबळे ।।’
शारदादेवी काय करते?… तर परमार्थाची साधना करणाऱ्या साधकांना योग्य काय नि अयोग्य काय याचा सारासार विचार निवडून दाखवते. विशिष्ट अक्षरात, तेवढ्याच शब्दांत एकेक ओवी रचावी लागते. त्यामुळे स्वामींना जे म्हणायचे आहे, ते प्रत्येक शब्दातून जास्तीत जास्त कसे व्यक्त होईल याची ते काळजी घेतात. शारदादेवी आपल्याला नुसता सारासार विचार, आत्मानात्मविवेक देत नाही तर तो विचार नेमका कोणता आहे, त्याची निवड करते आणि तो आपल्याला दाखवून देते. खरोखर रामदास, तुकाराम अशा आपल्या पूर्वसूरींची शब्दांवरची हुकूमत पाहून आपण चकित होतो.
नंतरच्या काळात अनेकांनी स्त्रियांना मठ्ठ समजण्यात धन्यता मानली. पण शेवटी आपल्या संस्कृतीचे संस्कार आपल्यावर होतच असतात आणि म्हणूनच अखेरीस
“नाना विद्या कळा सिद्धी । नाना निश्चयाची बुद्धी ।
जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी । ज्ञेप्तीमात्र ।।‘
मुळात शारदा ज्ञानमयच असल्याने सर्व प्रकारच्या विद्या, कला, सिद्धी आणि निश्चित बुद्धिरूप ज्ञान हा सारा शारदेचाच विलास असतो; असे रामदास स्वामी सांगतात.
अशा या थोराहून थोर व ईश्वराचा ईश्वर असलेल्या शारदेस नवरात्रीच्या निमित्ताने आपण नमन करू या!
माधुरी तळवलकर