अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना झाली की सर्वत्र देवीचा गजर सुरू होतो. दुर्गा, जगदंबा, रमा, अष्टभुजा, जोगेश्वरी, योगेश्वरी, अंबाबाई, तुळजाभवानी अशा अनेक नावांनी देवी ओळखली जाते. पण मूळरूप मात्र आदिशक्तीचे असते. जिची आपण,
दुर्गे दुर्गट भारी, तुजविण संसारी
अनाथ नाथे अंबे करूणा विस्तारी
म्हणून आरती, पूजा करून, नऊ दिवस सेवा केली जाते. नाना अलंकार, नवीन वस्त्र, वेगवेगळ्या अवतारातील देवीचे मोहक रूप पाहण्यासाठी पहाटेपासून मंदिरासमोर रांगा लागतात. गेली दोन वर्षे यात थोडा बदल झाला आहे, पण उत्साह तोच असतो. घरोघरीही घट बसवून देवीची उपासना केली जाते.
या देवी गजराचा, भक्तीचा एक भाग म्हणून देवी समोर नृत्य म्हणजे गरबा, दांडियाही केले जाते. महाराष्ट्रात याचा एक वेगळा भाग म्हणून लहान मुलींचा भोंडला केला जातो. हस्त नक्षत्र असते म्हणून गोल रिंगणात रांगोळीने हत्तीचे चित्र पाटावर काढून, दिवसानुसार खाली ठिपके काढतात आणि विविध गाणी म्हटली जातात, जी स्त्री जीवनाशीनिगडित असतात. वाड्यात, सोसायटीत अशा प्रकारे स्त्रिया आणि मुली फेर धरून गाणी म्हणून भोंडला खेळतात. मुलींच्या शाळेतूनदेखील भोंडला केला जातो. भोंडल्याची गाणी ही पूर्वापार मौखिक परंपरेने चालत आली आहेत. ती कुणी आणि कधी लिहिली यात न पडता, ती त्याच पद्धतीने आजही म्हटली जातात.
ऐलोमा पैलोमा, गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
म्हणून भोंडल्याची सुरुवात गणेश पूजनाने होते. याच गाण्यात पुढे
पडपड पावसा थेंबो थेंबी
थेंबो थेंबी आडव्या लोंबी…
हे हस्त नक्षत्राच्या टपोऱ्या थेंबांना म्हटले असेल. यापुढे याच गाण्यात
अंगणा तुझी सात वर्षे
भोंडल्या तुझी सोळा वर्षे
म्हणताना अंगणात हुंदडण्याचेही वय अधोरेखित केले आहे. तर सोळा वर्षांची मर्यादा भोंडल्याची घातली आहे. कारण हा बालपणीचा खेळ आहे.
एक लिंबू झेलू बाई,
दोन लिंबू झेलू
या गाण्यात पाच लिंबाचा पानोळा केला जातो. ही माळ हनुमानाच्या गळ्यात घातली जाते.
कारल्याचा वेल लाव गं सुने, लाव गं सुने म्हणताना त्या काळातील जुन्या पारंपरिक सासूची भूमिका छान पद्धतीने मांडली आहे. सुनेला माहेरी पाठवताना सासूची नाराजी आणि नाठाळपणा मोठ्या गमतीदार पद्धतीने मांडला आहे. मातीत बी पेरल्यानंतर, त्याला कारली लागल्यावर त्याची भाजी खाऊन, सर्व आवरून मगच ती सासू कशी बशी माहेरी जायला परवानगी देते. तिच्या मनाप्रमाणे झाल्यावर सून विचारते,
आती तरी जाऊ का माहेरा… अशी गंमत आहे.
अक्कण माती, चिकःकण माती
अशी माती सुरेख बाई
यात जात रोवण्यापासून, सपिटी दळून, सुंदर करंज्या करून, शेल्याने झाकून माहेरी पाठवायची तयारी आहे.
अस्स माहेर सुरेख बाई
खायाला मिळत… अस्स सार द्वाड बाई कोंडोनी मारत अशा शब्दांत त्यावेळच्या सुनांच्या दबलेल्या मनस्थितीचा अंदाज येतो. सासरी होणारे हाल आजही काही ठिकाणी चुकलेले नाहीत. याचं यथार्थ वर्णन मुलीच्या तोंडातून बाहेर पडतं. तशी अजूनही बरीच गाणी आहेत. सासर आणि माहेर एवढंच जग माहीत असलेल्या मुलींच्या मनाची, कोंडमाऱ्याची ही गाणी म्हणताना जाणीव होते.
काही आधुनिक गाणीही आहेत. ज्यात अगदी शिवाजी महाराजही आहेत. तर एक वेड्याचे गाणं केवळ मनोरंजनात्मक आहे. गाण्यात बदल कालमानाने होत गेले. पण परिस्थिती मात्र तीच आहे. आता इतकं मोकळं वातावरण माहेरी आणि सासरी कुठेही नव्हते. मुलींची घुसमट यातून व्यक्त होते.
एकत्र कुटुंबात राहताना, अजाण वयात विवाह झालेल्या या मुली घरातील वडीलधाऱ्या स्त्रियांकडून जीवनानुभव शिकत असत. अजाण किंवा जाणत्या वयातही रेव्ह पार्टीला जाण्यापेक्षा मुलींचा भोंडला निश्चितच चांगली परंपरा आहे.
भोंडल्याची खिरापत ही साधी म्हणजे पेरूची फोड, कधी एखादी वडी किंवा लाडू, भेळ, गोळ्या इतपत साधी असे. यातून गरीब श्रीमंत असा भेदभावही नसे. आपल्याकडील सर्वच परंपरात हा समतोल साधला आहे.
या नवरात्रीच्या निमित्ताने मनात ऐलोमा पैलोमाने फेर धरला होता. जुन्या आठवणीत पुन्हा एकदा फ्रॉंकमधील मैत्रिणींचे चिमुकले हात हाती घेऊन मी गुणगुणत होते
आड बाई आडोणी, आडाच पाणी काढोनी
आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला…
आरती मोने