मंडळी, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असा एक समज आहे. सर्वसामान्यांच्या बाबतीत हे खरे असेलही. पण चाळ या म्हणण्याला बहुतेक अपवाद ठरेल. कारण चाळीत बांधल्या गेलेल्या लग्नाच्या गाठीपैकी बहुतांशी गाठी या नळावरच बांधल्या गेल्या आहेत. या सार्वजनिक नळाच्या अनेक गमतीपैकी एक म्हणजे या नळांवर अनेकांना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. अनेकांचे आयुष्याच्या जिव्हाळ्याचे संबंध इथेच जुळले आहेत. असे संबंध न जुळलेली चाळ दिवा घेऊन शोधायला गेलात तरी सापडणार नाही.
मनात भरलेल्या “अनारकली’ला मिळवण्यासाठी “सलिम’ अनेक हिकमती लढवत असे. सकाळी पाणी भरण्याची वेळ त्याला अगदी सोईची होती. एकतर अशा वेळेस प्रत्येक जण आपल्या गडबडीत असे. त्यामुळे कोणाला त्यांच्याकडे लक्ष द्यायची फुरसत नसे किंवा फुरसत असली तरी लोकांच्या लफड्यात अडकण्याची कोणालाही गरज भासत नसे. आपल्या “अनारकली’ची नळावर येण्याची वेळ साधून हे “सलिम’ निरनिराळ्या कारणाने या नळाभोवतीच फिल्डिंग लावायचे. काही अतिहुशार सलिम तर खुशाल शौचालयाच्या लायनीत आपले टमरेल ठेवून आपल्या अनारकलीला पाणी भरण्यासाठी लागणारी सगळी मदत करायचे.
“अनारकली’च्या घरून कोणी पोक्त माणूस येईपर्यंत यांना टमरेल मोकळे करण्याची अजिबात घाई नसायची. मागून येणारी अनेक टमरेल आत जाऊन रिकामी होऊन आली तरी यांचे टमरेल जागेवरून हलत नसे. शत्रूपक्षाच्या गोटातून येणाऱ्या माणसांचा बहुदा यांना वास लागत असावा. किंबहुना “सलिम अनारकली’ निकाह पूर्णत्वाला जावा अशी मनीषा असलेले सलिमचे मित्र त्यांना मदतीला हजर होते, तर कधी शत्रूपक्षाची खबर काढण्यासाठी सलिमने आपले “जासुस’ जागोजागी पेरलेले असत.
अनारकलीच्या घरांकडून येणाऱ्या शत्रूच्या आगमनाची वर्दी सलिमला पोहोचवण्याचे काम ही मंडळी कुशलतेने करीत असत. त्यांचे ठरलेले परवलीचे संकेत मिळताच सलिम हातातली कामे सोडून आपल्या नंबरवर जाऊन मुकाट्याने उभे राहत असे. अनारकलीचा आणि आपला काहीच संबंध नाही अशी हुबेहूब बतावणी करत. हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून उद्या पुन्हा मी मदतीला येतो या संदेशाची देवाणघेवाण करत. भूतकाळात आपण केलेले पराक्रम आठवून अनेकांच्या ओठावर नकळत आलेले हसू मला इथे बसून दिसते आहे.
एका बाजूला चाळीतल्या बायकांचे पाणी भरत असताना चिवचिवाट चालू असताना पुरुषांच्या नळांवर मात्र एकाच बादलीत चार-पाच पुरुष मुकाट्याने अंग फक्त खंगळण्याचे काम करीत असत. त्याशिवाय जास्त काहीही कोणी करू शकत नव्हते आणि कोणी तसा प्रयत्नही केला असता तरीही इतरांनी त्याला त्या बादलीतच बुडवून अर्धमेले केले असते. ठराविक वेळेपुरती मर्यादित असलेली ही राजापूरची गंगा लुप्त होण्यापूर्वी पर्वणी साधता आली नाही तर दुसऱ्या दिवसाशिवाय अंगाला पाणी लागणार नाही याची खात्री असल्याने बाजूला चाललेल्या कोलाहलातून आपले ध्यान साधण्याची अजब कला या पुरुषांनी साध्य केली होती.एवढ्या कोलाहलात ध्यान लावण्याची अशक्य कामगिरी पुराणातही कुणाला नक्कीच जमली नसती.
बाजूच्या नळावर चाललेल्या धामधुमीचे कसलेच भान स्त्रियांनाही नसे. कमरेला पदर खोचून अंगावरची साडी ओली होऊन विनाकारण आजाराला आमंत्रण नको म्हणून गुडघ्यापर्यंत साडी वर घेऊन धुणी, भांड्यांसह समोर असलेली कामे निपटण्यात त्यांचे सारे लक्ष असे. आपले काम करण्यात पराकोटीची तल्लीनता त्या दाखवत होत्या. कामात एक सेकंदही उशीर झाला तर आपला नळावरचा हक्क रद्दबातल होणार या जाणीवेपोटी ही एकाग्रता आपोआपच साधली जात असे.
उडदामाजी काळे गोरे या न्यायाने चाळीतील काही आंबट शौकिन जमेल त्या अँगलने आपला कॅमेरा या बायकांवर सेट करून बसलेले असत. बायकांसह तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला याची पूर्ण जाणीव होती. पण “रोज मरे त्याला कोण रडे’ असे म्हणून या बायका त्यांच्याकडे काणाडोळा करीत असत. चाळीत जिथे सगळा कारभारच उघड्यावर असे तिथे असल्या गोष्टींना विशेष महत्त्व देण्याची कोणालाच इच्छा नव्हती.
चाळीच्या खोलीचे दरवाजे रात्र सोडली तर कधीच बंद नसत हे तुम्हाला माहीत आहेच. चाळीतली चहाटळ मुले रात्रीच्या अंधारात या बंद दाराच्या आड घडणाऱ्या गोष्टींवरही नजर ठेवत असत. म्हणूनच चाळीची बंद खोलीही एक उघडे पुस्तकच असे. त्यामुळे कोणाचीही कोणतीच गोष्ट कधीच खासगी राहत नसे.
सकाळच्या या नळाच्या वेळी चालणारी गडबड ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टपेक्षाही अत्यंत लयबद्ध चालत असे. प्रोजेक्टचे नियोजन एखाद्या वेळी चुकेल, पण नळावर येणाऱ्या बाईची वेळ चुकेल तर शपथ. प्रत्येक घरातल्या स्त्रीची उठण्याची आणि नळावर येण्याची वेळ ठरलेली असे. या वेळांचे नियोजन अगदी न चुकता रोजच्या रोज पाळले जात असे. त्यात कोणीही कधीही चुकत नसे. फक्त एकच गोष्ट हे नियोजन चुकवू शकत असे ती म्हणजे या नळातून पडणारी पाण्याची धार.
ही पाण्याची धार कमी झाली की नंबरावर असलेल्या बाईला पाणी भरायला उशीर लागत असे, आणि मग मागे असलेल्या बायकांनी मशेरी लावून परजलेले तोंड चालू होई. अर्थात यात कोणाचाही काहीही दोष नाही याची जाणीव प्रत्येकीला असली तरी या कमी धारेने आपला दिवसाचा उदरनिर्वाह होणार नाही याची काळजी प्रत्येकीला असे.
असो, तर अगदी थोडक्यात चाळीतले हे सार्वजनिक “नळपुराणसंपूर्णम्’. आता ही पुराणातली वांगी पुराणातच चांगली वाटतात. आजच्या पिढीला प्रत्यक्षात दाखवण्यासाठी काही चाळीत हे सार्वजनिक नळ असतीलही, आणि त्या नळातून पाणी जरी येत असेल, तरी येणाऱ्या त्या पाण्याला आपुलकीचा तो रंग नाही. अगदीच क्वचित कोणी एखादीच बाई या नळावर पाणी भरत असेल. बदलत्या परिस्थितीने चाळीचे सार्वजनिक नळ जाऊन प्रत्येक घरात स्वतंत्र नळ आले आहेत.
निवडणुकांत उभे राहणाऱ्या उमेदवारांनी मतांचा जोगवा मागताना अनेक चाळीतली नळांची गंभीर समस्या सोडवण्यासाठी चाळींना नळयोजना दिल्या आहेत. घराघरात स्वतंत्र नळ आले. घरात स्वतंत्र नळ आले म्हणून नळावरून होणारी बाचाबाची बंद झाली असे नाही. सध्या सार्वजनिक बाचाबाची न होता, बाचाबाची फक्त शेजारणीशीच होते, ती पण फक्त नळ असेपर्यंतच. त्यांचे कारण पण फार मजेशीर आहे.
नळ जरी स्वतंत्र झाले असले तरी त्यातून येणारे पाणी अजून स्वतंत्र झाले नाही. ते एकावेळी एकाच नळातून बाहेर येते त्यामुळे शेजारणीचा नळ बंद झाल्याशिवाय दुसऱ्या नळाला पाणीच येत नाही. आणि एकदा का नळ गेले की पुन्हा दुसऱ्या दिवसाशिवाय नळ येत नाही. सार्वजनिक नळांकडे नजर टाकल्यास केविलवाण्या नजरेने ते चाळीतल्या रणरागिणींची वाट पाहत आहेत असे वाटते. कोणी सलिम आपल्या अनारकलीसाठी पाणी भरण्यास मदत करायला नळावर येईल याची वाट पाहतो आहे.
– डॉ. नरेंद्र कदम