पुणे – गेल्या काही दिवसांत खडकवासला धरणातून शुद्धीकरण केंद्रात येणारे पाणी प्रचंड माती मिश्रित येत आहे. त्यामुळे घरोघरी गढूळ पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेने केलेल्या तपासणीत हे पाणी मानकापेक्षा तब्बल 200 पट गढूळ असल्याचे समोर आले आहे. यावर परिपूर्ण प्रक्रिया करून हे पाणी शुद्ध करून पुणेकरांना दिले असले, तरी त्याची 6 “नेफोलोमॅट्रिक टर्बिडिटी युनिट’ (पाण्याची गढूळता मोजण्याचे मानक) इतकी नोंदवली जात आहे. मानकानुसार हे प्रमाण अवघे 1 ते 2 असणे आवश्यक आहे.
“गेल्या 25 ते 30 वर्षांत धरणातून पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यात पहिल्यांदाच एवढी “टर्बिडिटी’ आढळून आल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर ही “टर्बिडिटी’ कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुरटी आणि पॉलिऍल्युमिनियम क्लोराइडचा वापर करावा लागला आहे.
शहरासाठी घेतले जाणारे रॉ वॉटर तसेच पाणी शुद्ध केल्यानंतर त्याचा पुरवठा करण्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. त्या तपासणीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेची पाणी तपासणीची स्वतंत्र प्रयोगशाळा असून, येथे प्रत्येक तासाला पाण्याची तपासणी सुरू आहे. यापूर्वी धरणातील पाण्यामध्ये 2015 मध्ये 150 “नेफोलोमॅट्रिक टर्बिडिटी युनिट’ आढळून आले होते. यावर्षी जुलै महिना संपला तरी पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठा तळाला गेला होता. त्यामुळे हे प्रमाण वाढले होते.
दक्षिण पुण्यात सर्वाधिक गढूळ पाणी
खडकवासला धरणातून पर्वती आणि वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात रॉ वॉटर आणले जाते. गेल्या काही दिवसांत वडगाव केंद्रातून पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांत सर्वाधिक गढूळ पाणी येत आहे. महापालिकेने वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याची “टर्बिडिटी’ तपासली असून, ती जास्त असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भागातील जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने “वॉशआऊट’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्याची गढूळता लक्षात घेऊन सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत पाणी पूर्ववत होईल, असे प्रशासनाने सांगितले.
धरणात मोठ्या प्रमाणात माती वाहून आली आहे. त्यामुळे महापालिकेसही माती मिश्रित पाणी मिळत आहे. आमच्या तपासणीत या पाण्याची “टर्बिडिटी’ 200 पर्यंत होती. इतरवेळी पाणी शुद्धीसाठी तुरटीचा वापर केला जातो. मात्र, हे पाणी अधिक गढूळ असल्याने पॉलिऍल्युमिनियम क्लोराइड वापरण्यात आले आहे. तसेच जलवाहिन्या स्वच्छ करण्यात येत असून, हे पाणी पूर्णत: शुद्ध तसेच तपासणी करूनच पुणेकरांना पुरवठा केला जात आहे.
– अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख.
गढूळ पाणी येण्याचे कारण काय?
शहरातील पर्यावरण अभ्यासकांच्या मते, “दरवर्षी जूनपासूनच धरणांच्या परिसरात पावसाला सुरुवात होते. त्यामुळे पाणलोट क्षेत्रांतील टेकड्या, डोंगर परिसरांत गवत, पावसाळी झुुडपेही वाढतात. ही झुडपांची मुळे माती धरून ठेवतात. त्यामुळे मोठा पाऊस झाला, तरी धरणात वाहून जाणाऱ्या पाण्यात मातीचे प्रमाण कमी असते. मात्र, यंदा जवळपास दीड महिना पावसाने दडी मारली. तसेच गेल्या दोन ते तीन वर्षांत पाणलोट क्षेत्रांत टेकड्या फोडण्यात आल्या आहेत. पावसाचे प्रमाणही यंदा जादा असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीची मातीही धरणाच्या पाण्यात वाहून आली आहे. हीच माती पाण्यासोबत जलवाहिनीतून पाणीपुरवठा केंद्रात येत आहे.