कविता हा शब्द डोळ्यापुढे येताक्षणीच मला आठवतो, सुरेश कंक. कवितेच्या प्रदेशात तो देहभान हरपून रंगतो. दोन अडीच महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या 27 तारखेला कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या एका साहित्यविषयक कार्यक्रमासाठी मी पिंपरीच्या कॉलेजमध्ये गेलो होतो. कार्यक्रमाहून परतताना मला पिंपळे गुरव येथे वास्तव्य करणाऱ्या सुरेशला भेटण्याची तीव्र इच्छा झाली. मी फोन केला तेव्हा तो कुठेतरी बाहेरगावी गेला असल्याचे समजले. माझ्या पुण्यापर्यंतच्या प्रवासात त्याच्या आणि माझ्या मैत्रीचे संपूर्ण पर्व डोळ्यांसमोर उभे ठाकले.
सुरेशची आणि माझी पहिली ओळख चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी पार पडलेल्या एका कवी संमेलनात झाली. पहिल्या भेटीतच तो काव्य प्रेमी असल्याची जाणीव मला झाली. हळूहळू मैत्री घट्ट होत गेली. त्याने आयोजित केलेल्या अगणित कवी संमेलनाच्या सुरम्य कथा मी ऐकत गेलो. सुरम्य कथा या शब्दाची निवड मी एवढ्यासाठी केली आहे की, मागील जवळजवळ चोवीस वर्षांत काही विशिष्ट सामाजिक हेतू डोळ्यांसमोर ठेवून लोक जागृती करण्यासाठी त्याने आपल्या असंख्य कवी मित्रांच्या सहाय्याने अनेक संमेलने पार पाडली आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे या उद्देशाने एक संमेलन एकदा अमावास्येच्या रात्री स्मशानभूमीत रात्री बारा वाजता सुरेशने पार पडले. संमेलनात उपस्थित कवींनी भूत पिशाच्च काहीही नसते या गोष्टीवर भर दिला. नदी प्रदूषण कमी व्हावे म्हणून नदी स्वच्छ ठेवा हा संदेश देण्याकरिता पवना नदीच्या तीरावर त्याने संमेलन घेतले. शेतातल्या मचाणावर संमेलन भरवून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत यासाठी प्रयत्न केले. त्या संमेलनाचे नाव भल्लरीदादा संमेलन असे होते. पाणी बचतीची महती सांगण्यासाठी कवींना उंटावर बसवून त्याने अत्यंत आगळे वेगळे संमेलन घेतले. गारठणाऱ्या थंडीच्या दिवसांत शेकोट्या पेटवून घेतलेले त्याचे संमेलन खूप गाजले. रेल्वेचे तिकीट काढूनच प्रवास करा तसेच रेल्वेची स्वच्छता राखा हा संदेश देण्यासाठी पिंपरी ते लोणावळा लोकलमध्ये सुरेशने कवी संमेलन घेतले.
पहाटेच्या राम प्रहरी गुलमोहराच्या झाडांखाली घेतलेल्या संमेलनाचे नाव होते गुलमोहर काव्य संमेलन. कवितेची गाडी आणि कवितेची गोडी या नावाने आयोजित केलेले संमेलन खास सजविलेल्या गाडीतून घेतले गेले. सर्जा राजाची गाडी आणि कवितेची गोडी नावाने घेतलेले संमेलन शेतकऱ्यांच्या हितासाठी होते. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडे खात खात त्याने संमेलन आयोजित केले. क्रांती दिनाचे औचित्य साधून क्रांतिकारांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाजवळ सुरेशने संमेलने आयोजित केली. निरनिराळ्या ठिकाणी मशाली पेटवून मशाल कवी संमेलन घेतले. इंद्रायणी नदीच्या डोहात जेथे तुकारामाच्या गाथा बुडविल्या गेल्या त्या ठिकाणी आयोजित केलेल्या संमेलनाचे नाव होते गाथा संमेलन. हेल्मेट वापरणे का आवश्यक आहे यासंबंधीच्या प्रबोधनासाठी हेल्मेट कवी संमेलन घेतले. मोहन हो या मायकल रोज चलावो सायकल हा संदेश देत कवींना दुचाकीवर बसवून संमेलन घेतले.
चिंचवड पिंपरी उद्योग परिसरातील असणाऱ्या छोट्या छोट्या कंपन्यांत काम करणाऱ्या अनेक कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा सप्ताहानिमित्त संमेलने घेतली. पारावरचे कवी संमेलन, “छत्री खोल कविता बोल’ संमेलन तसेच घामाच्या कविता कवी संमेलन अशी काही संमेलनाची नावे आहेत. आळंदी येथील मंदिरात पार पडलेले “उभा क्षणभरी कवी देवाचिया दारी’ हे संमेलन तसेच ग्रंथालयात आयोजित केलेले दिवाळी मध्यान्ह कवी संमेलन त्याचप्रमाणे चाफ्याच्या झाडाखाली घेतलेले “चाफा बोलेना’ नावाचे संमेलन आणि “सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ कवी संमेलन ही सर्व संमेलने काव्य संमेलनाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरावा अशी आहेत.
नुकतेच पुणे मेट्रोत आयोजित केलेल्या साहित्यिकांच्या सफरीत मेट्रोत रंगले संमेलन या नावाचे कवी संमेलन खूपच अविस्मरणीय होते. कवितेच्या प्रदेशात मोलाचे कार्य पार पाडणारी त्यांची संस्था आहे, दुसरी कोणतीही माझ्या तरी पाहण्यात आलेली नाही. मनाच्या वारुळातून बाहेर पडलेली सुरेशच्या मैत्रीच्या आठवणीची मुंगी नजरेसमोरून दिसेनाशी झाली तेव्हा माझे घर पुढ्यात येऊन ठेपले होते. त्याचे विविधांगी उपक्रम मात्र माझ्या डोळ्यासमोर पिंगा घालत राहिले.
बबन पोतदार