भाषेतून भावना प्रकट होतात असे म्हणतात. प्रत्येक भाषेची एक लिपी असते आणि त्या लिपीला स्वतःचे असे सौंदर्य असते. देवनागरी लिपीतील शब्द रोमन लिपीत लिहिल्यास अनेक शब्दांचे अर्थ वेगळे होतात आणि त्यांची अर्थछटाही बदलते. उदाहरणार्थ, जर तुम्ही “लडके’ असा शब्द रोमनमध्ये लिहिलात तर त्यातील “डी’चा ध्वनी वेगळा आहे आणि देवनागरीत लिहिला तर “ड’चा ध्वनी वेगळा आहे.
इंग्रजी पार्श्वभूमी असलेल्या अभिनेत्यांच्या उच्चारणासंदर्भातील समस्या आपण बऱ्याच काळापासून पाहात आहोत. परंतु आपल्याला हेदेखील समजून घ्यावे लागेल की, आपण हिंदीतून चित्रपट तयार करत आणि दाखवत असलो तरी, बॉलीवूड हा चित्रपटनिर्मिती उद्योग केवळ हिंदीभाषिकांचा नाही. निर्माता, लेखक आणि प्रेक्षक हे चित्रपटाचे प्रमुख तीन घटक असतात.
प्रेक्षक निश्चितच हिंदी चित्रपट पाहणारे आहेत; परंतु चित्रपट तयार करणारे लोक संपूर्ण भारतभरातून आलेले आहेत. काही आंध्र प्रदेशातून, काही केरळमधून, काही बंगालमधून तर काही गुजरातमधून आले आहेत. त्यांना हिंदी भाषा येत नसेल किंवा नीट कळत नसेल; परंतु त्यांना सिनेमाची भाषा अवगत आहे. सिनेमा हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याची भाषा वैश्विक आहे.
आपल्या चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रकार, कला दिग्दर्शक आहेत, ज्यांना हिंदी येत नाही. अशा लोकांना हिंदी वाचता येत नाही; परंतु हिंदी समजते. आता या बहुभाषिक चित्रपटसृष्टीत फक्त हिंदी लिपी असावी, असे म्हटले तर ते योग्य होणार नाही. संहिता देवनागरी लिपीत नसावी, असे येथे बिलकूल म्हणावयाचे नाही. अर्थातच ती देवनागरीत असावी; परंतु ज्यांना ही लिपी वाचता येत नाही, त्यांना रोमन लिपीतही ती द्यावी. इंग्रजीची अनिवार्यता दूर करा, असे आपण म्हणू शकतो. परंतु हिंदीची अनिवार्यता लादावी, असे म्हणू शकत नाही.
मी माझी संहिता फक्त हिंदीतच लिहितो आणि कधी-कधी इंग्रजीतही दिलीत तर बरे होईल, अशी विनंतीही मला केली जाते. संहितेचा पहिलाच मसुदा मला कोणीही इंग्रजीतून मागितला नाही. एका मोठ्या निर्मिती संस्थेचे प्रमुख केरळचे आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांना हिंदी वाचता येते; परंतु वेळ जास्त लागतो. मला हिंदीत संहिता द्या; गरज भासल्यास पुढे मी संहितेचे इंग्रजीत रूपांतर करून घेईन, असे त्यांनी सांगितले. मी अमिताभ बच्चन आणि अनेक प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम केले आहे. बच्चन साहेबांना फक्त देवनागरी संहिताच हवी असते. जेव्हा मी “सरकार’ चित्रपट लिहीत होतो, तेव्हा माझी अडचण अशी होती की, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना हिंदी संहिता वाचता येत नव्हती म्हणून मी इंग्रजीत संहिता दिली.
बच्चन साहेबांनी तिचे देवनागरीत रूपांतर करण्यासाठी एका व्यक्तीची सेवा घेतली होती. परंतु त्या व्यक्तीच्या कामावर मी समाधानी नव्हतो. त्यामुळे मी स्वतःच त्यांच्यासाठी ती संहिता देवनागरीत लिहिली. बच्चन साहेब असोत किंवा पंकज त्रिपाठी आणि नवाजुद्दीनसारखे अभिनेते असोत, उत्तर भारतातून येणारे सर्व कलाकार देवनागरीत लिहिलेल्या संहितेला प्राधान्य देतात. एका मोठ्या दिग्दर्शकाला देवनागरी वाचायला येत होती, म्हणून त्यांनी हिंदीतच संहिता लिहून मागितली.
तात्पर्य असे की, ज्यांना हिंदी वाचता येते त्यांना रोमन लिपीमध्ये संहिता देण्यास सांगितले जात नाही. चित्रपट निर्मिती कंपन्यांमध्ये देशाच्या विविध भागांतून लोक आले आहेत आणि अनेक लोक परदेशातून शिक्षणासाठी आले आहेत. तिथे काम करणारे सर्वच लोक लखनौ, जयपूर किंवा पाटण्यातील नाहीत. बंगाली, कन्नड, तमिळ इत्यादी प्रादेशिक चित्रपटांतील बहुतेक लोक स्थानिक भाषा जाणणारे आहेत. त्यामुळे रोमन लिपीत लिहिण्याची फारशी गरज नसते. बॉलीवूड हा महासागर आहे. इथे परदेशी लोकही वेगवेगळ्या विभागांत काम करतात. माझ्या आकलनानुसार कोणत्याही फिल्म युनिटमधील निम्मे लोक हे बिगर हिंदी भाषिक आहेत.
हिंदी विरुद्ध दक्षिण भारतीय भाषा हा वादही अनावश्यक आहे. असे वादविवाद ना सिनेमाच्या हिताचे आहेत ना हिंदी किंवा इतर भाषांच्या हिताचे आहेत. सिनेमाला भाषा नसते. ती संवादाला असते. आपल्याला अनेक देशी-विदेशी भाषा येत नाहीत; पण त्या भाषांमध्ये बनवलेले चित्रपट आपण शोधून-शोधून पाहतो. आपण इराण, फ्रान्स किंवा इटलीचे चित्रपट बघत नाही का? आम्हाला बंगाली येत नाही तरीही सत्यजित रे किंवा ऋत्विक घटक यांचे चित्रपट आपण पाहतो. दक्षिणेचे सगळेच सिनेमे हिंदीत डब केले जात नाहीत, म्हणून आपण त्यातले बरेचसे बघत नाही! आपण असे चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्या आशयाचे, उद्दिष्टाचे आणि शैलीचे कौतुक केले जाते.
हिंदी चित्रपटसृष्टीपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांचा अधिक बोलबाला असल्याची चर्चाही अलीकडे रंगली आहे. तो एक टप्पा आहे आणि तो शाश्वत नाही. एकूण व्यवसायावर नजर टाकली तर कमाईच्या बाबतीत “दंगल’ खूपच पुढे असेल. हिंदी भाषिक प्रदेशातून दाक्षिणात्य चित्रपटांना एकूण कमाईचा फार कमी हिस्सा मिळतो. “द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहा… तुम्ही त्याच्याशी सहमत आहात की असहमत हा वेगळा मुद्दा आहे; पण चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. ज्या दिवशी हिट होण्याचा फॉर्म्युला निवडला जाईल, त्या दिवशी चित्रपटाची जादूच संपून जाईल.
– राम कुमार सिंह