मुंबई – मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरी तसेच एक कर्णधार म्हणून रोहित शर्माची कामगिरी पाहता त्याने यंदाच्या स्पर्धेतील उर्वरित लढतींतून माघार घ्यावी, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच हा ब्रेक कामगिरी उंचावण्यासाठी नसून तंदुरुस्ती टिकवण्यासाठी आवश्यक असल्याचेही सांगितले.
यंदाच्या स्पर्धेची रचना होम व अवे अशी पारंपरिक असल्याने प्रत्येक संघाला सातत्याने सामने खेळावे लागत आहेत. त्यातच रोहितची वैयक्तिक कामगिरी तर सुमार होतेच आहे; परंतु संघाचीही दुर्दशा झालेली आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघाला रोहितच्याच नेतृत्वाखाली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे.
त्यानंतर आशिया करंडक स्पर्धा व लगेचच भारतातच होत असलेली एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा खेळायची आहे. त्यासाठी कर्णधार रोहित पूर्ण तंदुरुस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही गावसकर म्हणाले.
जरी रोहितने उर्वरित सामन्यांतून माघार घेतली व मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला तर त्याने संघात पुनरागमन करायला हरकत नाही. कारण रोहितसारखा मुख्य खेळाडू संघाबाहेर असणे योग्य नाही. मात्र, मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही तर रोहितने कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सराव सुरू करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.