लंडन – विराट कोहलीच्या फॉर्मबाबत सातत्याने प्रश्न विचारुन तूम्हाला काय मिळते. त्याच्या कारकीर्दीतील एक खराब कालखंड सुरु असला तरीही तो जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. त्याला वेगळे काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तूम्ही असे प्रश्न वारंवार का विचारत आहात. थोडे थांबा कोहली भरात येइल व सर्व टीकाकारांची तोंडे बंद करेल, असा विश्वास व्यक्त करत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने माध्यमांच्या प्रतिनिधिंचीही कानउघडणी केली.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर रोहित माध्यमांशी एका पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी त्याला विविध माध्यमांच्या प्रतिनिधिंनी कोहलीबाबत प्रश्न विचारले व रोहित संतापला.
कोहली महान फलंदाज आहे. गेल्या काही काळापसून त्याच्याकडून मोठी खेळी झालेली नाही. तो अपयशाच्या कालखंडाचा सामना करत आहे. पण त्याची गुणवत्ता अफाट असून या स्थितीतून बाहेर येण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. नेटमध्ये तासंतास कसून सराव करत आहे. अशी वेळ प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत येते व त्यातून तो खेळाडू बाहेरही येतो, तसेच कोहलीही या परिस्थितीतून बाहेर येत पुन्हा एकदा यश मिळवेल. त्याला थोडा वेळ द्या. तो अपयशी ठरत असल्यावरून सातत्याने त्याला टीकेचे लक्ष्य करणे योग्य नाही, अशा शब्दात रोहितने कोहलीची पाठराखण केली आहे.
आशिया करंडकात यशस्वी ठरेल
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी कोहलीला भारतीय संघातून विश्रांती देण्यात आली आहे. आता पुढील काळात आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा होत असून कोहली या स्पर्धेद्वारे निश्चितच भरात येइल. त्याच बॅटमधून मोठी खेळी साकार होइल व त्यावेळी त्याच्यावर टीका करणारेच त्याचे कौतुक करताना दिसतील, असाही चिमटा रोहितने काढला.