मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून चांगलेच राजकारण तापले आहे. त्यातच काल खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाचे आरक्षण हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले असून यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. तेच नेते आता सत्तेत आहेत. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात, असा सवालही उदयनराजे भोसले यांनी केला आहे. दरम्यान उदयनराजेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्जतमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “ते नेमकं काय बोलले हे मला माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण आज एकमेकांवर टीका करण्याची गरज नाही. एकत्र राहून आरक्षणाच्या बाबतीत मार्ग काढावा लागेल. कोणाला श्रेय घ्यायचं नाही. लाखो लोक गेली कित्येक वर्ष लढत आहेत त्यांना श्रेय जाणार आहे. लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास आहे,” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीका केली आहे. “एकदा माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी तुम्ही म्हणताय तसंच बालिशपणाचं, कमी अभ्यास करुन वक्तव्य केले होते. त्याला मी उत्तर दिले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी असेच एक वक्तव्य केले, ज्याकडे मी दुर्लक्ष केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी इतकी वक्तव्यं केली. त्याच्यात कोण छोटा कोण छोटा हेदेखील त्यांनी सांगितले. त्यांनी आपलं मन आणि जिगर दाखवून दिलं आहे. त्यांच्याइतके मोठे नेते खालच्या पातळीवर येत असतील तर आम्ही मोठ्याच नेत्याला दुर्लक्ष करत असू तर अशी वक्तव्यं करुन मोकळे होतात त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. माझ्या कार्यकर्त्यांनीच मला हे सांगितलं आहे,” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. “त्यांची योग्यता लोकांनी ठरवावी. एखादं वक्तव्य केल्यानंतर त्यानंतर त्यावर काय प्रतिक्रिया येतात त्याचा त्यांनी अभ्यास करावा. त्यावरुनच त्यांची योग्यता कळेल. याशिवाय जास्त काही बोलायचं नाही,” असेही ते म्हणाले.