पाटणा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनच्या संबंधात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तथापि, त्या बैठकीला आम आदमी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाला निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यावरून राष्ट्रीय जनता दलाने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की आमचा पक्ष बिहारमधील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून आमचे संसदेतही पाच सदस्य आहेत. या बैठकीसाठी आम्हाला निमंत्रण का देण्यात आले नाही याविषयी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी खुलासा केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
खासदारांचे संख्याबळ हा जर निकष असेल तर अपना दल, शिरोमणी अकाली दल, कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स अशा पक्षांना बैठकीचे निमंत्रण कसे दिले गेले, असा सवालही त्यांनी विचारला आहे. लालूप्रसाद यांच्या ज्येष्ठ कन्या मिसा भारती यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, जो सवाल दागेंगे, साहेब उसे भगाऐंगे, म्हणजेच जो पक्ष सरकारला प्रश्न विचारेल त्या पक्षाला हे सरकार पळवून लावते.