औरंगाबाद – वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी फूट पडली आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मान न राखल्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत गेल्या दोन महिन्यांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. मात्र समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ 8 जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.
एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनीही प्रकाश आंबेडकरांसोबत 5 सप्टेंबर रोजी पुण्यात अनेक बैठका केल्या. मात्र प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसी यांना ईमेल पाठवून 8 जागांची ऑफर दिली. मात्र, एमआयएमने 2014 विधानसभा निवडणुकीत 24 जागा लढवल्या होत्या. यामध्ये आम्हाला दोन जागांवर विजय मिळाला. नऊ ठिकाणी एमआयएम दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होती. सध्या पक्षाचे विविध जाती-जमातीचे जवळपास 150 नगरसेवक आहेत. जिथे एमआयएमचे आमदार आहेत, त्या जागाही आंबेडकरांनी सोडल्या नाहीत, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
औरंगाबाद महानगरपालिकेत एमआयएमचे 26 नगरसेवक आहेत. विरोधी पक्षनेते आणि गटनेते दोन्ही अनुक्रमे सरिता अरुण बोर्डे आणि श्री गंगाधर ढगे हे अनुसूचित जातीतील आहेत. मात्र जागावाटपाचा तिढा न सुटल्याने आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत आहेत, असे जलील यांनी स्पष्ट केले.