कराड – कराड शहरासह तालुक्यात शुक्रवार सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. शुक्रवारी गौरी पूजनाचा दिवस असल्याने महिलांची हळदी-कुंकू कार्यक्रमाची लगबग सुरू होती. मात्र संतत पडणाऱ्या पावसाने महिलांमधून नाराजी व्यक्त होत होती. शुक्रवारी दिवसभर ढगाळ व थंड वातावरण असल्याने अनेकांनी बाहेर पडणे टाळले. दरम्यान कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा व कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कृष्णा नदीचे पाणी प्रीतिसंगमावरील पायऱ्यांना लागले आहे.
कराड नगरपालिकेच्या वतीने नदीकाठालगत असणाऱ्या कुंभार पाणवटा व पाटण कॉलनीतील कुटुंबांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास येथील कुटुंबांची तात्काळ दुसरीकडे व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. सध्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पा विराजमान झाले असल्याने कोणीही घरे सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते. दरम्यान शुक्रवारी कोयना धरण क्षेत्रातील पावसाचा जोर मंदावल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.