नागठाणे – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे (ता. सातारा) येथील उड्डाण पुलाच्या निकृष्ट बांधकामाचा प्रत्यय पुन्हा आला आहे. सातारा-कराड मार्गिकेवर शुक्रवारी कॉंक्रिट खचून खड्डा पडला असून उड्डाण पुलाखाली सुमारे तीन फूट व्यासाचे कॉंक्रिट तुटून पडले आहे. याच उड्डाण पुलावर सहा महिन्यांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे या उड्डाण पुलाच्या क्षमतेवर व कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हा पूल चार वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला असून अल्पावधीत दोनदा पुलाचे कॉंक्रिट निसटून पडल्याने या पुलावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. या पुलाचे व पूल बांधणाऱ्या कंपनीचे आता जिल्हाधिकाऱ्यांनी “ऑडिट’ करावे, अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे येथे लाखो रुपये खर्चून मोठा उड्डाण पूल बांधण्यात आला आहे.
आयटीडी कंपनीने हा उड्डाण पूल बांधला आहे. चार वर्षांपूर्वी हा सहापदरी उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाला. गुरुवारी रात्रीपासून या उड्डाण पुलाच्या सातारा-कराड लेनवरील खालच्या बाजूचे कॉंक्रिट तुटून पडू लागले. शुक्रवारी सकाळी सुमारे तीन फुटाचा स्लॅबचा तुकडा पडून लोखंडी सळया उघड्या पडल्याने या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाली आहे.
फेब्रुवारीमध्ये या उड्डाणपुलाच्या कराड-सातारा या मार्गिकेवर खड्डा पडला होता. पुलाखालील कॉंक्रिट स्लॅब निसटून लोखंडी सळया उघड्या पडल्या होत्या. शुक्रवारी त्याच्या विरुद्ध बाजूस पहिल्या खड्ड्याच्या समोरच आताचा खड्डा पडला आहे. यापूर्वीही आयटीडी कंपनीच्या कामाविषयी अनेक तक्रारी झाल्या होत्या; परंतु त्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याचे समजते. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीविरुद्ध आता जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.