लोणी देवकर -इंदापूर तालुक्यात खडकवासला धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे न्हावी, रुई थोरातवाडी, कळस आदी गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच वाढत्या उन्हामुळे शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु खडकवासला धरणातून उन्हाळी आवर्तन सोडल्यामुळे सध्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याने आम्हाला वेळेवर पाणी मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जलसंपदा विभागाने केलेल्या नियोजनामुळे अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पाणी पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे.
…विजेचा लपंडाव सुरूच
ऐन उन्हाळ्यात आवर्तन सोडल्याने शेतकऱ्यांची आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी धडपड सुरू असते, मात्र महावितरणच्या गैरकारभारामुळे नेहमीच शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या इंदापूर तालुक्यात दिसत आहे. महावितरणने देखील शेतीच्या विजेसाठी अखंडित वीजपुरवठा देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.