मंचर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने ९९ हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. कारण केंद्र सरकारने नेमलेली एजन्सी हा कांदा देशभरातील शेतकऱ्यांकडून चालू बाजारभावाने खरेदी करणार आहे आणि तेवढाच कांदा ही एजन्सी बाहेरील सहा देशांमध्ये निर्यात करणार आहे.
म्हणजे चालू बाजार भावाप्रमाणे ९९ हजार टन कांदा हे खरेदी करणार चालू बाजारभावाप्रमाणे, खरेदी केलेल्या कांद्यातून निर्यात बंदी उठवल्याचा निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केला आहे.
कांदा निर्यात करण्यासाठी ठेवलेला चालू बाजार भाव शेतकऱ्यांना न परवडणारा आहे .त्यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना कुठलाही फारसा फायदा होणार नाही केंद्र सरकारने लिमिटेड पद्धतीने असा कांद्याचा कोटा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवी, असे सांगून स्वाभिमानीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले कांद्याची निर्यात म्हणजे हा पुन्हा एकदा चुनावी जुमला आहे.
गुजरातमधील २००० टन सफेद कांदा निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली. आधीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असलेला राग व संताप लक्षात घेऊन केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा राग व संताप कमी करण्यासाठी ही केलेली एक प्रकारे दिशाभूल आहे. केंद्र सरकारला जर खरोखर शेतकऱ्यांचे भले करायचे असेल तर त्यांनी कांद्यावरची निर्यात बंदी कायमची उठवावी व कांद्याला किमान २२ ते २५ रुपये किलोला भाव द्यावा,
अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली आहे. सध्या कांदा निर्यातीसाठी घेतलेला निर्णय यामध्ये देखील शेतकऱ्यांकडून किती कांदा खरेदी होईल, याबाबत शंका आहे. व्यापाऱ्यांकडूनच मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला जाऊ शकतो, असेही बांगर यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक
केंद्र सरकारने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये अशी स्पष्ट नोंद नाही की नव्याने किंवा नवीन ९९ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. त्यामुळे ही सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक आणि दिशाभूल आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे .केंद्र सरकारने पाठीमागे देखील कांदा निर्यात बंदी उठविल्याची आवई केली. परंतु त्याचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना झालेला दिसला नाही.असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केला आहे.