नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणीदरम्यान निकालासंदर्भात टिप्पणी केली.
या खटल्याची सुनावणी करणाऱ्या घटनापीठाचे एक न्यायाधीश 15 तारखेला निवृत्त होत असल्यामुळे याच आठवड्यात निकाल लागेल, असे बोलले जात होते. या निकालावरच महाराष्ट्राचं पुढचं राजकीय भवितव्य ठरणार आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
यावर आता अजित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले,’ज्या दिवसापासून केस दाखल केली, तेव्हापासून चर्चा चालू आहे. ही गोष्ट जूनमध्ये घडली. आज जवळपास मे महिना आहे. बहुतेकजण म्हणत होते की मे महिन्यात सुट्या लागतात. त्याआधी याबद्दलचा निकाल लागेल. त्यानुसार आता निकाल येतोय.’ असेही ते म्हणाले आहे.
वृत्तवाहिनीशी बोलतांना ते म्हणाले,’निकाल आज लागणार आहे. माझं स्वत:चं मत आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालय हेच सर्वोच्च आहे. त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. घटनेनं त्यांना तो दिला आहे. त्यामुळे ते विचार करतीलच. मात्र हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला स्वत:ला वाटतं. मी काही मोठ्या वकिलांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं आलं की यासंदर्भात बहुतेक विधिंमडळातली ही बाब आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडूनच त्यांनी माहिती घेऊन निकाल द्यावा अशी शक्यता नाकारता येत नाही.” असेही ते म्हणाले आहे.