पुणे – राज्यात तलाठी भरती परीक्षेला दि.17 ऑगस्टपासून सुरुवात झाली असताना नाशिक आणि नागपूर जिल्ह्यात पेपर कॉपीसंदर्भातील घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन सुरक्षितेबाबत अधिक काटेकोर नियोजन टीसीएस कंपनीकडून केले जात आहे.
यात प्रामुख्याने परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परीसरात जॅमर यंत्रणा बसविण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, घड्याळ, मोबाइल, हेडफोड किंवा इतर वस्तूदेखील केंद्रावर नेहण्यास उमेदवारांना मज्जाव करण्यात आला आहे. विविध टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येत असल्याने प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वेगवेगळे आहे. उमेदवार परीक्षेला बसल्यानंतर 15 मिनिटांनी प्रश्नपत्रिका ऑनलाइन समोर येते. या प्रश्नपत्रिकेवर सांकेतिक चिन्ह, संगणक क्रमांक, काळ, वेळ तसेच परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आल्याची माहिती भूमि अभिलेख विभागाने दिली.
राज्यातील तलाठी भरती परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार, पेपरफुटी प्रकरणामुळे जिल्हा प्रशासकीय पातळीवरून संबंधित प्रक्रिया थेट जमाबंदी आयुक्तांच्या समन्वयाने घेण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार 4 हजार 466 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून राज्यभरातून तब्बल 11 लाख अर्ज प्राप्त झाले.त्यापैकी 10 लाख 30 हजार उमेदवार परीक्षेसाठी पात्र झाले असून, एकाचवेळी परीक्षा घेण्याचे नियोजन, परीक्षा केंद्र आणि आसन व्यवस्था, सुरक्षितता आणि इतर नियोजनाबाबत पूर्ण तयारी करत दि.17 ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक जिह्यात परीक्षा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत समिती नेमण्यात आली आहे.
अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन
नाशिक व नागरपूर येथे तलाठी परिक्षेसंबंधित प्रकार परीक्षा केंद्रांच्या बाहेर घडला असून संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधितांची चौकशी सुरू असून परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीने देखील याबाबत ऑनलाइन सुरक्षिततेबाबत काटेकोर नियोजन केले आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा सुनियोजीत वेळेत ठरल्याप्रमाने टप्प्यांमध्ये पार पडणार असून उमेदवारांनी निश्चिंतपणे परीक्षेला सामोरे जावे, अफवा पसरवणाऱ्यांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.