पुणे – सुमारे 10 दिवसांच्या विश्रांतीच्या टप्प्यानंतर आता नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याचे संकेत आहेत. राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल, तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून नैऋत्य मोसमी पावसाने “ब्रेक’ घेतला. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात पुन्हा पावसाला सुरुवात होऊन येत्या 24 तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून क्षेत्र आता हिमालयाकडून दक्षिणेकडे सरकले आहे. तसेच बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असल्याचे हवामान अंदाज विभागातील हवामान शास्त्रज्ञ वैशाली खोब्रागडे यांनी सांगितले.
दि. 17 ऑगस्टपासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज होता. हळूहळू पावसाचा जोर वाढेल, विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याच्या शक्यतेमुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. या आठवड्यात मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.
मान्सूनचा सगळ्यात मोठा “ब्रेक’: राजीवन
यंदा मान्सूनचे उशिरा आगमन आणि कमी सक्रिय यामुळे त्याला चांगलाच “ब्रेक लागला. हा ब्रेक सर्वाधिक म्हणजे सुमारे दहा दिवसांपेक्षा जास्त होता. या “ब्रेक’मुळे कृषी क्षेत्रासाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या वर्षीचा “ब्रेक’ कालावधी हा मान्सूनमधील सर्वाधिक मोठा कालावधींपैकी एक आहे. या आधी 18 जुलै ते तीन ऑगस्ट 1972 मध्ये ब्रेक लागला होता. त्यानंतर जुलै 2002 मध्ये 24 दिवसांचा ब्रेक झाला होता. सन 1972 मध्ये सर्वात मोठा दुष्काळही अनेकांनी अनुभवला होता, अशी माहिती “अर्थ सायन्सेस’चे माजी सचिव माधवन राजीवन यांनी दिली.