पुणे – राज्यात तलाठ्यांची सुमारे पाच हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका तलाठ्यांकडे दोन ते चार गावांचा कारभार आहे. अतिरिक्त कारभार तसेच इतर शासकीय कामे, वरिष्ठ कार्यालयातील बैठका आदींमुळे तलाठी हे कोणत्या दिवशी गावांत उपस्थित राहणार आहे, याची माहिती नागरिकांना होत नाही. या पार्श्वभूमीवर आता शासनाने तलाठी यांना सजा मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा, बैठका आदींची माहिती तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावाव्यात. तसेच सजा कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थितीबाबतचे वेळापत्रक निश्चित करून त्यांची माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. तलाठी यांच्याकडे असलेली गावांना भेटी देणे, पंचनामे, स्थळपाहणी, वरिष्ठ कार्यालयांकडे असणाऱ्या बैठका, राजशिष्टाचार पाहणी, तपासण्या इत्यादी कामी उपस्थित रहावे लागते.
अपवादात्मक परिस्थितीत तलाठी यांना सजा मुख्यालयीन कार्यालयामध्ये उपस्थित राहता येत नाही. एकापेक्षा जास्त गावासाठी एकच तलाठी असल्याने तलाठ्यांनी जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यभार असलेल्या सजाच्या ठिकाणी अथवा गावांच्या ठिकाणी ठराविक वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
तलाठ्यांकडे असतात ही कामे
तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद असून जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तलाठी यांच्याकडे महसूल विभागाकडील कामे असतात. यामध्ये प्रामुख्याने सात-बारा उताऱ्यावर खरेदी विक्री नोंदी घेणे, वारसनोंद आदी कामे असतात. तसेच शेतकऱ्यांशी निगडित पीक पाहणीची
ई-पीक पाहणी या मोबाइल ऍपद्वारे नोंदणी करणे, नुकसानीचे पंचनामे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी मदत व पुनर्वसनाचे काम करणे यासाठी तलाठी हे अतिशय महत्त्वाचा दुवा आहेत.
तलाठी कर्मचाऱ्यांची राज्यातील सद्यस्थिती
15 हजार 744 – एकूण मंजूर पदे
5 हजार 38 – सध्याची रिक्त पदे
4 हजार 644 – पदे भरण्याची प्रक्रिया सुरू