कोलकता -अग्निपथ योजनेंतर्गत संरक्षण दलांमध्ये भरती केल्या जाणाऱ्या अग्निवीरांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली.
मोदी सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेवर बहुतांश विरोधी पक्षांप्रमाणेच ममताही टीकेची झोड उठवत आहेत. त्यांनी वर्धमान येथील कार्यक्रमात बोलताना त्या योजनेविषयी पुन्हा नाराजी व्यक्त केली. अग्निपथ योजनेंतर्गत 4 वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जाईल.
तो कालावधी संपल्यानंतर सैनिक काय करणार? त्यांचे पुढील भवितव्य काय असणार? त्यांचे भविष्य अनिश्चित असेल. त्यामुळे अग्निवीरांच्या निवृत्तीचे वय वाढवण्यात यावे अशी आमची मागणी आहे, असे त्या म्हणाल्या. अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर विरोधासाठी देशभरात निदर्शनांचे सत्र सुरू आहे.