ऍड. आभा सिंग
एकीकडे आपला देश जगातील सर्वांत कमी घटस्फोटांचा दर असणारा देश म्हणून या संदर्भातील निर्देशांक यादीत सामील आहे. दुसरीकडे भारतात दिवसेंदिवस घटस्फोटांच्या घटना वाढत चालल्या आहेत. देशात टिकणाऱ्या लग्नांचा उच्चदर पाहून असे लक्षात येते की, लग्नात दोन्ही कुटुंबांची मोठी भागीदारी असल्यामुळे घटस्फोट होत नाहीत.
कुटुंबातील सदस्य नेहमी हस्तक्षेप करतात आणि घरातील ज्येष्ठ मंडळीच पती-पत्नींचे समुपदेशक बनतात. ही एकीकृत समाज संरचना जोडप्यांना घटस्फोट घेण्यापासून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत रोखू शकते. त्याचबरोबर भारतात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणाऱ्या महिलांची संख्या फारशी नाही. त्यामुळे अशा महिलांजवळ मुळातच पर्याय मर्यादित असतात.
घटस्फोट मिळविण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालत असल्यामुळे त्याचाही परिणाम घटस्फोट कमी होण्यावर होतो. कधीकधी घटस्फोटाचे एखादे प्रकरण वर्षानुवर्षे सुरू राहते. त्यामुळे पती-पत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक आणि आर्थिक दबाव वाढत जातो. भारतात आता वातावरण बदलत आहे. पूर्वी महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसल्यामुळे घरगुती हिंसाचाराला बळी पडल्या तरी पतीसोबत राहत होत्या. घटस्फोट घेणे त्या टाळत असत.
आता मात्र आर्थिकदृष्ट्या महिला मजबूत होण्याचे प्रमाण वाढत आहे. पुरुषांवरील त्यांचे अवलंबित्व कमी झाले आहे. अशा महिला अपमानजनक आणि आक्रमक व्यवहार सहन करत नाहीत. असा व्यवहार करणाऱ्या पुरुषांसोबत त्या राहू इच्छित नाहीत. वडिलांच्या संपत्तीत कायदेशीर अधिकार मुलींना मिळाल्यानेही महिलांची स्थिती मजबूत झाली आहे.
व्यभिचार हा भारतात घटस्फोट घेण्यासाठी एक वैध आधार मानला जातो. भारतीय समाजात महिलांची स्थिती बदलत आहे, ही चांगली गोष्ट आहे. अनेक महिलांना आता जीवनातील निर्णय स्वतःच्या मतानुसार घेण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे. त्यामुळे वैवाहिक संबंध चांगले नसल्यास त्या बंधनात राहू इच्छित नाहीत. घटस्फोट घेऊन त्या नवीन जीवन सुरू करू इच्छितात. कायद्यांविषयी वाढत्या जागरूकतेमुळेही भारतात घटस्फोटांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
आपण आपल्या मुलींना उच्चशिक्षित करणे आवश्यक आहे. असे केल्यास मुली त्यांच्या जीवनात येणाऱ्या आव्हानांना भिडण्यासाठी तयार होऊ शकतात आणि ताठ मानेने जगू शकतात.